सांगली : एक मुलगा एसटीमध्ये अधिकारी, दोन मुले सोन्या-चांदीच्या व्यवसायात, तर एक मुलगा शेती व्यवसायात स्थिरस्थावर. तरीही म्हातारपणी आधाराला कोणी नाही. स्वमालकीच्या घरातून मुलांनी हकालपट्टी केली तर जगायचं कसं आणि कशासाठी? असा सवाल करीत आटपाडीतील एका वृद्ध दांपत्याने इच्छामरणासाठी तहसीलदारांकडे परवानगी मागितली आहे. विठ्ठलापूर (ता. आटपाडी) येथील निवृत्त शिक्षक पांडुरंग विष्णू दीक्षित आणि त्यांची पत्नी शालन दीक्षित यांनी मुलांना नीट सांभाळ करण्याचे आदेश व्हावेत अन्यथा आम्हाला इच्छामरणासाठी परवानगी मिळावी असा अर्ज तहसीलदारांना केला आहे. याबाबत दीक्षित दांपत्याने तहसीलदार सागर ढवळे यांना पाठवलेल्या अर्जात म्हटले आहे की, आम्ही विठ्ठलापूर येथे राहतो. आम्हाला सुजित, संजय, सतिश, प्रवीण अशी चार मुले आहेत. विठ्ठलापूर येथे दोन घरे आणि शेती आहे. ऑगस्ट महिन्यात मुलगा सतिशच्या नावे केलेल्या घरामध्ये आम्ही राहत होतो. पण सतिशने घरातून बाहेर जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे वडिलार्जित घर मिळकत क्रमांक ६३७ मध्ये राहण्यास गेलो असता दुसरा मुलगा प्रवीणनेदेखील आम्हाला हाकलून दिले. सध्या आम्ही आटपाडी येथे राहतोय. सुजित, संजय, सतिश आणि प्रवीण यांनी आमचा सांभाळ केला नाही. घरातून हाकलून लावून बेघर केले आहे. औषधपाणी, देखभाल करण्यास नकार दिला आहे. हेही वाचा - मुंबई: कर्मचार्याची हत्या करून बँकेवर टाकला दरोडा, स्निफर डॉग आणि १० वर्षांच्या मुलीमुळे दोन दरोडेखोर गजाआड आम्ही या चार मुलांचे पालनपोषण, संगोपन व्यवस्थित करून त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यांना व्यवसाय उभारण्यास मदत केली. चौघांची थाटामाटात लग्ने लावून दिली. सुजित राज्य परिवहन महामंडळामध्ये अधिकारी आहे. संजय शेती करतो. सतिश व प्रवीण ही दोन मुले सोनार कामाचा व्यवसाय करतात. चारही मुलांचे उत्पन्न चांगले आहे. मुलांनी आमच्या म्हातारपणी आम्हाला आधार बनून आमचा संभाळ करणे गरजेचे असताना आम्हाला घरातून हाकलून लावले आहे. त्यामुळे आमचे हाल सुरू आहेत. विठ्ठलापूर येथील दोन्ही घरे मुलांच्या ताब्यातून काढून आमची राहण्याची व्यवस्था करावी. सर्व मुलांनी आमचा सांभाळ करावा. औषधोपचार करावेत याबाबत मुलांना आदेश व्हावेत. अन्यथा अशा मरणयातना भोगण्यापेक्षा स्वेच्छा मरणाची मागणी या दांपत्याने निवेदनाद्वारे केली आहे. हेही वाचा - ‘सोयरे’ शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ; गिरीश महाजन, “तर आरक्षण देता येत नाही…” श्रीमती दीक्षित (वय ७७) यांचे हात व पाय मोडले आहेत. त्यामुळे धड चालताही येत नाही, हातांनी कोणते कामही करता येत नाही. तर अर्जदार दीक्षित (वय ७९) हे पाठीच्या व ह्दयाच्या विकाराने ग्रस्त असून दैनंदिन जीवन कसेतरी जगत आहेत, असाही उल्लेख या अर्जात करण्यात आला आहे.