शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत राज्यात सत्ता मिळवली. दरम्यान काँग्रेस आणि शिवसेनेतील वैचारिक मतभेदावरुन नेहमीच विरोधक दोन्ही पक्षांवर निशाणा साधत असतात. राज्यातही अनेकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसोबतच्या संबंधांवर स्पष्ट मत मांडलं आहे.

शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”.

राहुल गांधी शिवसेनेपासून सावध भूमिका घेतात का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी, “हे खरं नसून दिल्लीत युती झाल्याची माहिती दिली. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला संमत केलं”.

“…त्यात चुकीचं काय?,” काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांना राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी अशक्य -पटोले

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे”.

दरम्यान शरद पवार भाजपाविरोधात महाआघाडीची चाचपणी करत असून त्यात काँग्रेसची काही भूमिका आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार यांनी काही विरोधकांची बैठक बोलावली आहे. ते स्वागतार्ह आहे. अशा सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आली आहे हे वेळेसोबत कळेल. जर शरद पवार भाजपाशी लढत असतील तर स्वागत आहे. आम्हाला त्याची चिंता का असावी?”.