गौण खनिज उत्खननावर सरसकट बंदी आणल्याने वाळू व चिरे प्रचंड महागले आहे. हे साहित्य सध्या मिळत नाही. मात्र छुप्या पद्धतीने मिळविल्यास वाळू लोडसाठी सुमारे १५ हजार रुपये दर आकारला जात आहे. या प्रचंड महागाईचा दणका घर, रस्ता, पूलबांधणीला बसत असल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे.
गौण खनिज उत्खननावर बंदी सरसकट लागू करण्यात आली असल्याने वाळू चिरे, काळा दगड, विटा उत्पादन थंडावले आहे. त्यामुळे हजारो हातांचे काम थांबले असून, त्याचा फटका घरबांधणी, रस्ताबांधणी, विहीर किंवा धरणबांधणीवर बसला आहे.
या हंगामात सर्वसामान्य लोकही घरदुरुस्ती किंवा नवीन बांधणी करतात. त्यांनाही जोरदार फटका बसला आहे. गौण खनिज उत्खननावर बंदी आदेश लागू होण्यापूर्वी चार महिने अगोदर दोन ब्रास वाळूच्या डंपरसाठी सहा ते आठ हजार मोजावे लागत होते तेथे आज १४ ते १५ हजारांवर दर आकारला जात आहे.
चिरे खाणीवर प्रति नग दहा रुपये दिला जातो. तोच पोहोच प्रति नग २२ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एका ट्रिपमध्ये २५० ते ३०० नग चिऱ्यांसाठी साडेपाच ते साडेसहा हजार मोजावे लागत होते. त्याशिवाय घरबांधणी कामगारांचा दर वेगळा ठेवण्यात आला आहे. चिरे, वाळू, काळा दगड, विटा हे साहित्य प्रचंड दराने वाढले आहे. त्यामुळे हे दर कोण निश्चित करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गौण खनिजबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून, काळा बाजाराने विक्री करणाऱ्यांचे फावले आहे.
वाळू एका लोडमध्ये दोन ब्रास राहू शकते. त्याचा दर सुमारे १४ ते १५ हजार रुपये ठेवण्यात आला आहे.