गोवा राज्यातील मोरजी येथील स्मशानभूमी परप्रांतीयांनी बळकाविली आहे. त्यावर गोवा सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अंत्यविधीसाठी सुमारे २० किलोमीटर दूर जावे लागत आहे. याकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे लक्ष वेधले जावे असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी केले.
गोवा मराठी पत्रकार संघाने तिलारी पाटबंधारे प्रकल्प विश्रामगृहावर साळगांवकर, पत्रकार श्रीकांत कासकर व हेमलता वळवेकर यांचा सत्कार  केला, तेव्हा साळगांवकर बोलत होते.
माझे मूळ कुटुंब मोरजी येथील असले तरी माझी कर्मभूमी महाराष्ट्रात सावंतवाडी हीच राहिली. मी माझ्या नातेवाईकाच्या निधनप्रसंगी गेलो असता मोरजी येथे परप्रांतीयांनी बळकाविलेल्या जमिनीतील स्मशानभूमीही जागी नाही हे मला दिसले. ही वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्या असे आवाहन बबन साळगावकर यांनी पत्रकारांना केले. गोवा प्लास्टिक मुक्तीसाठी पत्रकारांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी श्रीकांत कासकर यांनीही पत्रकारितेतील ३० वर्षांचा अनुभव कथन केला. यावेळी गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक, गोविंद नाईक, पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश परब, दामोदर दाभोळकर, जयंत कासकर, चंद्रकांत वळवेकर, अभिजीत काजणे, जयराम राणे व अन्य पत्रकार उपस्थित होते.
गोवा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व कुटुंबीयांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.