वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील तरुण शेतकरी बंडू दादाजी चंदे (वय ३२) याने शेतीवरील कर्ज व आर्थिक विवंचनेपायी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. राजुरा तालुक्यातील गेल्या दहा दिवसातील ही तिसरी आत्महत्या आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बंडू चंदे याच्यावर चिंचोली सेवा सहकारी संस्थेचे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच गावातील बचत गटाचेही कर्ज होते. गेल्या दोन वर्षांपासून कमी उत्पन्न झाल्याने तो सारखा चिंतेत होता. त्याच्याकडे १३ एकर शेती असून यंदा त्याला खरीप लागवडीसाठी कर्ज मिळाले नाही. अखेर हवालदिल झालेल्या या युवा शेतकऱ्याने १९ जून रोजी रात्री आठ वाजता घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. विरुर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी राजुरा येथे पाठवण्यात आला आहे.

या शेतकऱ्याचे मागील वर्षी लग्न झाले होते. त्याच्यामागे पत्नी, आई व आजी असा परिवार आहे. या युवा शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.