‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, किसान कार्यकर्ता यादवराव नवले, कामगार वसंत पवार आणि महाड तालुक्यातील दासगाव येथील कॉ. आर. बी. मोरे प्रागतिक विद्यालय या संस्थेस येथील कॉम्रेड नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ‘दीपस्तंभ पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. २० जानेवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील अलंगुन येथे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त अनुराधा मालुसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दीपस्तंभ पुरस्कारांचे हे १३ वे वर्ष आहे. रूपये ११ हजाराचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुस्तक, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काँम्रेड नाना मालुसरे यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील कामगार, कष्टकरी, आदिवासी, पत्रकारिता आणि शिक्षण संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो. पत्रकारितेसाठी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर उर्फ मधु अप्पा कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारितेव्दारे त्यांनी श्रमिक, कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी व उपेक्षित वंचितांचे प्रश्न याविषयी आवाज उठविला आहे. आदिवासी क्षेत्रातील कार्याबद्दल अहमदनगर येथील किसान कार्यकर्ता यादवराव तुकाराम नवले यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग १५ वर्ष विडी कामगारांच्या जिल्हा संघटनेच्या कार्यकारिणीत कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांनी  लढा दिला. पानबंदचा लढा, काम कपात तसेच विडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतनासाठी दिलेला लढा त्यांनी यशस्वी केला. आदर्श कामगार म्हणून पुणे येथील वसंत जनार्दन पवार परिचीत आहेत. सिटू संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. आदर्श शिक्षण संस्था म्हणून रायगड जिल्ह्यातील दासगाव येथील कॉ. आर. बी. मोरे प्रागतिक माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संध्याचे काम देवयानी मोरे पाहत असून शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी बहुजन कातकरी आदिवासी आहेत.
कॉ. नानांच्या जन्मदिनी म्हणजेच १२ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा काही कारणास्तव हा सोहळा २० जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष कॉ. जीवा पांडू गावित हे राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर नाशिक येथील आयएमए सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता पी. साईनाथ यांचे ‘पत्रकार व समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.