उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांना 'बाळराजे' म्हणत शेलक्या शब्दांत टीका केलीय. जे काम आम्ही केले आहे, त्याचे श्रेय सत्ताधारी घेत आहेत, असा दावा आदित्य ठाकरे करतायत. पण आम्ही कोणाच्याही कामाचे श्रेय घेत नाही. जे काम आम्ही केले आहे, त्याचेच श्रेय आम्ही घेतो, असे फडणवीस म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कोस्टल रोडचे आज (११ मार्च) लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य नेते उपस्थित होते. "एका लेनमुळेदेखील मुंबईकरांना खूप फायदा होणार" या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या किनारी रस्त्याची एक लेन आपण आजपासून चालू करत आहोत. लवकरच आपण संपूर्ण रस्ता चालू करू. सध्या सुरू करण्यात येणाऱ्या एका लेनमुळेदेखील मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळेच एका लेनचे काम पूर्ण झाले असून तो मार्ग बंद ठेवण्यात फायदा नाही. हा मार्ग सुरू झाल्यावर अर्ध्यापेक्षा अधिक रहदारी कमी होईल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग चालू करण्याचा निर्णय घेतला. "आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेत नाही" देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली. "मला काल समाजमाध्यमावर बघायला मिळालं की उबाठाचे (शिवसेना, ठाकरे गट) बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. "कोस्टल रोडची बांधण्यास परवानगी नव्हती" "२००४ ते २०१४ या काळात राज्य आणि केंद्रात यूपीएचं सरकार होतं. कोस्टल रोडची सर्वांत मोठी अडचण ही होती की, आपल्या नियमांत सी लिंक बांधण्यास परवानगी होती. पण कोस्टल रोड बांधण्यास परवानगी नव्हती. कारण कोस्टल रोड तयार करण्यासाठी रेक्लेमशन करावे लागते. रेक्लेमेशन केल्यावर सीआरझेडची लाईन बदलते. म्हणूनच रेक्लेमेशन करू देणार नाही, अशी केंद्राची भूमिका होती," असेही फडणवीस म्हणाले. "दिल्लीहून हात हालवत परत यायचे" "मी याआधी अनेक मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडसाठी दिल्लीला जाताना पाहिले. पण दिल्लीहून ते हात हालवत परत यायचे. केंद्राने त्यांना कोस्टल रोडसाठी परवानगी दिलीच नाही. केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं. आम्ही कोस्टल रोड तयार करण्यासाठी परवानगी मिळवण्यास सुरुवात केली. मला आठवतं त्यासाठी केंद्र सरकारसोबत पाच बैठका झाल्या. प्रत्येक अडचणीवर आम्ही पर्याय काढू लागलो. सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं आम्ही केंद्राला सांगितलं," अशी माहिती फडणवीसांनी दिली.