नक्षलवाद्यांशी संबंध ठेवण्याच्या आरोपावरून ‘प्राइममिनिस्टर फेलो’ महेश राऊत याची चौकशी सुरू केली असून यादरम्यान गडचिरोली पोलिसांनी त्याला विनाकारण त्रास देऊ नये, अशा आशयाचे पत्र खुद्द केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना पाठविल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
महेश राऊतला गेल्या आठवडय़ात ताब्याता घेतले होते. राऊत व त्याच्या मैत्रिणीवर अनेक गंभीर आरोप असल्याने पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.  अशातच केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी महेश राऊतला विनाकारण त्रास न देण्याचे आदेश असलेले पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.  रमेश यांचे पत्र मिळाले असले तरी त्यात आणखी कोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आला, याची अधिक माहिती देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट नकार दिला.
फेलो राऊत याची अहेरी मुख्यालयातून बदली करून त्याला गडचिरोली मुख्यालयात हलविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, त्याची चौकशी सुरूच राहणार आहे. मात्र, रमेश यांच्या अशा पत्राने पोलीस  दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   सबळ पुरावा मिळाल्याशिवाय महेशला अटक करायची नाही, अशीच पोलीस दलाची भूमिका आहे. त्यामुळे तपासात गडचिरोली पोलिसांच्या हाती आणखी काय काय लागते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.