सोलापूर : सोलापुरात भाजपाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक आणि एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) प्रवेश करण्यासाठी सकाळी शंभरपेक्षा अधिक मोटारींचा ताफा घेऊन हैदराबादकडे रवाना झाले. या सर्वांचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित सायंकाळी बीआरएस पक्षात प्रवेश होणार आहे. भाजपाचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले या चार माजी नगरसेवकांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे सर्वजण पाचशे कार्यकर्त्यांसह हैदराबादकडे रवाना झाले. हेही वाचा - शिवसेनच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस, अपात्रतेचा निर्णय लवकरच होणार? गेल्या २७ जून रोजी आषाढी वारीचे निमित्त पुढे करून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह बीआरएस पक्षाचे सर्व आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सोलापूर आणि पंढरपूरला आले होते. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांनी आपल्या सरकोली गावात चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी शेतकरी मेळावा भरवून बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी सहाशे मोटारींचा मोठा ताफा घेऊन चंद्रशेखर राव यांनी केलेला सोलापूर व पंढरपूर दौरा राज्यात चर्चेचा विषय झाला होता. याच दौऱ्यात चंद्रशेखर राव यांनी सोलापुरात भाजपाचे दिवंगत, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी सुरेश पाटील, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगनबाई आंबेवाले, सुभाष शेजवाल हे माजी नगरसेवक हजर होते. या सर्वांना चंद्रशेखर राव यांनी विकासाच्या मुद्यावर बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. यापैकी सुरेश पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिला असला तरी पुढील रविवारपर्यंत (१६ जुलै) भूमिका ठरविण्याचे स्पष्ट केले आहे. तर सुभाष शेजवाल यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. हेही वाचा - तुम्ही परत या मी निघून जाईन, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवार गटाला आवाहन शहरातील प्रामुख्याने तेलुगु भाषकांचा पट्टा असलेल्या पूर्वभागाकडे बीआरएस पक्षाने अधिक लक्ष देऊन तेथे बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच पूर्व भागात राहणारे काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी सर्वप्रथम बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. भाजपाचे दहा माजी नगरसेवक बीआरएस पक्षात येण्यास इच्छूक असल्याचा दावा सादूल यांनी केला आहे.