‘नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधील पाणी कालव्यामधून सोडून शेतीला देऊ नये,’ असा आदेश गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक शरद पाटील यांनी नाशिकचे मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांना दिला आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी असूनही खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यास जलसंपदा विभागाला अडचणी येत आहेत.
नगर जिल्ह्णाातील मुळा धरणात ५ हजार ३६७ दशलक्ष घनफूट, भंडारदऱ्यात ४ हजार ९४६ दशलक्षघनफूट पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ातील दारणा धरणात ४ हजार ५७६ दशलक्ष घनफूट व गंगापूर धरणात २३७९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची विशिष्ट पातळी कायम राखावी म्हणून जलसंपदा विभागाचे काही नियम आहेत. त्यामुळे गंगापूर व दारणा धरणातून खाली पाणी सोडण्यात आले. या पाण्यातून शेतीसाठी आवर्तन करण्याऐवजी ते गोदावरी नदीतून जायकवाडीत जाऊ देण्यात आले आहे.
नगर जिल्ह्य़ात पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिन्यात पेरणीलायक पाऊस झाला, पिकांची उगवण झाली आहे. पावसाने ताण दिल्याने ती जळून चालली आहेत. त्यामुळे मुळा, भंडारदरा, दारणा व गंगापूर या धरणांतून शेतीकरीता आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. पण, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक पाटील यांच्या आदेशामुळे खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे धरण पातळी राखण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिकांना देता आलेले नाही. मराठवाडय़ात यंदा पावसाची कृपादृष्टी आहे. तेथील पिके चांगली आहेत. पण नगर जिल्ह्य़ात अद्यापही पाऊस झालेला नाही. काही भागात झालेल्या थोडय़ाफार पावसावर लावलेली पिके जगविण्यासाठी शेतीला आवर्तनाची गरज आहे.
गंगापूर व दारणा धरणांतून पाणी सोडावे लागले असले तरी मुळा व भंडारदरा धरणांत मात्र पाण्याची मोठी आवक झालेली नाही. नाशिक जिल्ह्य़ातील धरणे १५ ऑक्टोबर नंतर पूर्ण क्षमतेने भरुन घेतली जातात, तर मुळा व भंडारदरा धरणे १५ ऑगस्टनंतर पूर्ण क्षमतेने भरते. त्यामुळे तूर्त तरी दोन्ही धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. जायकवाडीच्या पाण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या वाल्मीचे महासंचालक हिरालाल मेंढेगिरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अद्याप आपला अहवाल दिलेला नाही.
नेत्यांची भूमिकाच नाही..
राज्य सरकारने कुठलेही आदेश दिलेले नसतांना केवळ तांत्रिक कारण पुढे करुन जायकवाडीत पाणी नेले जात आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून, वेळप्रसंगी पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. असे असूनही प्रवरा खोऱ्यातील आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, शंकरराव गडाख, शिवाजी कर्डीले या लोकप्रतिनिधींनी तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, प्रसाद तनपुरे, तुकाराम गडाख, गोिवदराव आदिक यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही.