गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. ईडीच्या अटकेनंतर संजय राऊत जवळपास १०० दिवस मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात होते. त्यांना दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागली होती. त्यामुळे तुरुंगात दिवाळी कशी साजरी केली? याबाबत विचारलं असता खासदार संजय राऊत यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे.

तुरुंगात दिवाळी कशी साजरी केली? याबाबत संजय राऊतांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. मी राजकीय कैदी असल्यामुळे इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगाच्या आवारात मला स्वातंत्र्यपणे फिरण्याची मुभा नव्हती. त्यामुळे तुरुंगात दिवाळी कशी साजरी करतात? याची फारशी कल्पना नाही. पण तुरुंगाबाहेर फुटणाऱ्या फटाक्यांवरून दिवाळी असल्याचं समजत होतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “भाजपाला निवडून द्या, रामलल्लाचं मोफत दर्शन घडवू”; अमित शाहांच्या विधानावर आव्हाडांची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले…

तुरुंगातील दिवाळीबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “ऑर्थर रोड तुरुंग मध्यवस्तीत आहे. आजूबाजूला सगळ्या चाळी आहेत. मराठी वस्ती आहे. तिथे पहाटेपासून दिवाळीचं वातावरण असतं. तुरुंगात असताना दिवाळीच्या आदल्या दिवशी घरून थोडासा फराळ आला होता. त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती. त्याबरोबर एक उटण्याचं पाकीटही आलं होतं. मग आम्ही तीन-चार लोकांनी ते उटणे वाटून घेतलं आणि स्वत:च स्वत:च्या अंगाला लावून घेतलं. घरी आई किंवा पत्नी अंगाला उटणे लावत असते. पण आम्ही स्वत:च्या हाताने उटणे लावून थंड पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर एक चकली आणि एक लाडू होता, तो आम्ही खाल्ला, अशी आम्ही दिवाळी साजरी केली.”

हेही वाचा- गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ आरोपावरून शरद पवार गट ॲक्शन मोडमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्याला आहे त्या परिस्थितीत सामावून घेता आलं पाहिजे. युद्धावरच्या सैनिकांची कुठे दिवाळी असते. मी स्वत:ला राजकीय कैदी मानतो. आम्ही या देशातील लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी देशात सध्या जे हुकूमशाही प्रवृत्तीचं राजकारण सुरू आहे, ते मोडून काढण्यासाठी बोलत राहिलो, काम करत राहिलो. अशावेळी त्यांनी आमच्यावर खोटे खटले दाखल केले तर ते आम्ही स्वीकारले पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले.