केंद्र सरकारने दोन वर्ष नुसतीच आश्वासने देऊन जनतेला धोका दिला आहे. आता जनलोकपाल विधेयक मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही नाही असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्घीत बोलताना केला. येत्या दि. १० पासून दहा जनतंत्र मोर्चाच्या झेंडय़ाखाली आंदोलन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सक्षम जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी हजारे हे येत्या दि. १० पासून राळेगणसिद्घीत बेमुदत उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन तसेच जनतंत्र मोर्चाच्या देशभरातील कार्यकर्त्यांची बैठक राळेगणसिसिध्दी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हजारे म्हणाले, आपली लढाई केवळ जनलोकपालाच्या मागणीसाठी नसून शेतकरी, शेतमजूर ,कामगार यांच्यासह देशातील सामान्य जनतेला व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत जनलोकपाल मंजूर झाले नाही तर काय निर्णय घ्यायचा हे त्यावेळी कार्यकर्त्यांंशी चर्चा करून ठरविले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशभरात हे आंदोलन जनतंत्र मोर्चाच्या झेंडयाखाली होईल असे त्यांनी सांगितले.
विश्वंभर चौधरी म्हणाले, हजारे यांचे नाव व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर करून या आंदोलनात कोणीही वर्गणी गोळा करण्याचे उद्योग करू नयेत. कमी खर्च असणारी आंदोलने आपआपल्या एैपतीवर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
देशभरातील सर्व राज्यात व प्रमुख शहरांमध्ये आंदोलन होणार असल्याचे संतोष भारती यांनी सांगितले. आंदोलनाचे मुख्य केंद्र राळेगणसिध्दीत ठेवण्याचे सर्वांनी मान्य केले. हजारे यांचे सहाय्यक दत्ता आवारी यांनी सोशल नेटवर्कीग वरून त्यांचे संदेश व आंदोलनाची माहिती कळविली जाईल असे सांगितले. या बैठकीत देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येऊन तसे नियोजनही करण्यात आले. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यातील समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. हा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला. देश व राज्य पातळीवरील कार्यकर्त्यांंनी राळेगणसिद्घीत न येता स्वत:चा जिल्हा अथवा तालुका पातळीवर आंदोलन करून जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले.