उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेल्याचं चित्र आहे. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते करत आहेत. मात्र, आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना यामध्ये यश आलेले दिसत नाही. दरम्यान, आपण अजित पवार यांना शेवटचं भेटून समजावणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असतानाच भाजपानं राजकीय चमत्कारच घडवला. शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याच पत्र देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निर्णयामुळे राजकीय पंडितांनाही बुचकळ्यात पाडलं.

आणखी वाचा- अजित पवारांचा बंडांचा झेंडा कायम; “मी शेवटचं भेटून समजवणार”

भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त आहेत. त्यांनी काल सगळ्यांचे ट्विटरवरून आभार मानलेच. त्याचबरोबर “आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, शरद पवार हेच आपले साहेब आहेत. भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देईल,” असं अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, भाजपासोबत जाण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील हे नेते गेल्या दोन दिवसांपासून त्यांची समजूत घालत आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांनी अजित पवारांची मनधरणी करण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. “आपण शेवटचं भेटून अजित पवारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे,” असं त्यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलं.

आणखी वाचा- शिवसेनेबाबत ‘तो’ संदेश पाठवल्याने आम्ही अजितदादांसोबत : अनिल पाटील

जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला जाण्याआधी अजित पवारांची भेट घेतलेल्या छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. छगन भुजबळ म्हणाले, “घर तुटता कामा नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल, अशी आशा आहे. तसेच समजावून सांगण्याचा उद्देश सफल झालेला नाही,” असं भुजबळ म्हणाले.