राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर आज (९ नोव्हेंबर) निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. आजच्या सुनावणीला शरद पवार गटाकडून स्वत: शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. निवडणूक आयोगासमोरील सुनावणी पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आज निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अॅफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अॅफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अॅफिडेव्हिटचे २४ भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखवले होते. मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर ‘हाऊस वाईफ’ असं नाव लिहिण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होतं. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. व्हेरिफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं, अशा प्रकरणात जवळ-जवळ २० हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत, असं ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसंघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं.”

हेही वाचा- “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

“फुटीर गटाचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ मुकुल रोहतगी यांनी खूप युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, आताच्या क्षणाला याची गरजच नाही. परंतु, निवडणूक आयोगाने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. अभिषेक मनुसंघवी यांनी भारतीय संविधानाप्रमाणे प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलणं, हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली,” असंही आव्हाडांनी पुढे नमूद केलं.

हेही वाचा- “भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?”, बच्चू कडूंचा रोखठोक सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “यापुढे काय होईल? हे मला माहीत नाही. पण हे सगळं खोट आहे, खोट्याच्या आधारावर आहे, हे मात्र आज समोर आलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात, हे सिद्ध झालं. निवडणूक आयोग काय निकाल देईल? याबद्दल मला फार काही समजून घ्यायची इच्छा नाही. पण पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की, हे केलेलं सगळं खोट होतं. म्हणजे मी जे म्हणतोय तेच अधर्माविरुद्ध धर्माची लढाई.”