सांगली : मुरलीधर मंदिरातील शाळेत गमभन गिरवले, कोटणीस मार्गावरील वाडय़ात संगीताचे सूर आळवले अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे बालपणापासूनची १४ वर्षे व्यतीत केलेल्या सांगलीशी हळवे नाते होते. दीदींचा हा काळ आयुष्यातील सर्वाधिक अस्वस्थतेचा व कठीण परीक्षेचा होता. सांगलीकरांनी मंगेशकर उत्सव आयोजित करून माहेरवाशीण समजून लता दीदींना सुवर्णाक्षरांनी लिहिलेले मानपत्र देऊन गौरवही केला. लतादीदींची जडणघडण सांगलीत झाली होती. पिता दीनानाथ यांच्यासमवेत मंगेशकर कुटुंब सांगलीत वास्तव्यास आले, त्या वेळी दीदी पाच वर्षांच्या होत्या. सांगलीत असतानाच त्यांनी मुरलीधर मंदिरात भरणाऱ्या शाळेत गमभन गिरवले. बसस्थानकाजवळ असलेल्या कोटणीस मार्गावरील दुमजली वाडय़ात हे कुटुंब वास्तव्यास होते. १३ खोल्या असलेल्या वरच्या माळय़ावर मंगेशकर राहात, तर तळमजल्यावर लतादीदींचे गणूमामा म्हणजेच मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे वास्तव्य होते. याच वाडय़ात मंगेशकर कुटुंबातील आशा,उषा आणि हृदयनाथ या भावंडांचा जन्म झाला. महापालिकेने मास्टर दीनानाथ यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगलीत ‘मंगेशकर उत्सव’ साजरा केला. यानिमित्ताने मंगेशकर कुटुंबाचा गौरव करण्यात आला होता. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने तत्कालीन महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते सुवर्णाक्षरांनी लिहिलेले मानपत्र लता दीदींना तरुण भारत स्टेडियमवर २५ हजाराच्या जनसमुदायाच्या साक्षीने प्रदान करण्यात आले. बालपणापासून तरुणपणापर्यंतची १४ वर्षे सांगलीत व्यतीत केली असल्याने दीदींच्या मनात सांगलीबद्दल हळवेपणा होता.