अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये काम करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अतिदुर्लक्षामुळे ६ नोव्हेंबर रोजी ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या आगीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तेव्हा त्यात असं आढळून आलं की आग लागली तेव्हा आयसीयूमधले कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी गेलेले होते.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील मनोज पाटील यांनी सांगितलं की, आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये रुग्णालयाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. ते जवळच्या कॅन्टीनमध्ये चहा-नाश्ता करण्यासाठी गेले होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदत केली असती तर अनेकांचे जीव वाचवता आले असते. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू असून पुरावे सापडल्यास आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. याविषयी इंडिया टुडेने सविस्तर वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – नगर रुग्णालय आगप्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई

या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या. जिल्हा सरकारी रुग्णालयास शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत ११ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती आणि संबंधितांशी चर्चा केली होती. याप्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. त्यानंतर आरोग्य खात्याने जिल्हा शल्यचिकित्सकांसह संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.