रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत असल्याने सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने आढावा बैठक घेत संबंधित राज्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

“महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णसंख्या कमी असून राज्य रुग्णसंख्येच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे,” असं राजेश टोपे म्हणाले.

Covid 19: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “रुग्णसंख्या लक्षात घेता…”

“सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसंच भविष्यात करोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

…काही निर्बंध लागू केले जाऊ शकतात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “करोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचं आवाहन केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो”.