ज्ञानवापी संदर्भात जो इतिहास आहे. त्याला आम्ही बदलवू शकत नाही. त्यावर वाद निर्माण केले जात असून रोज नवनवे पुरावे सादर केले जात आहे. मात्र, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरनंतर आता आंदोलन करायचे नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. रेशीमबाग येथील मैदानावर राष्ट्रीय संवयेसवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस ते बोलत होते. एकत्र येऊन प्रश्न सोडवू मुस्लिम व हिंदूनी आपआपसात समन्वय ठेवत सर्वसंमतीने आणि न्यायालयाचा सन्मान राखत यातून मार्ग काढला पाहिजे. मात्र, आपल्या स्वार्थासाठी देशात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात फसू नये, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. जेव्हा इस्लाम आक्रमकांच्या माध्यमातून भारतात आला, तेव्हा भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हजारो देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाही, तर त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे असे हिंदूना वाटते. पण मनात प्रश्न निर्माण होतात. असे काही असेल तर एकत्र येऊन प्रश्न सोडवा असेही भागवत म्हणाले. काय आहे ज्ञानवापी प्रकरण? पाच महिलांनी ज्ञानवापी मशिद परिसरात असलेल्या श्रृंगार गौरी देवीची पूजा करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितलेली आहे. त्यासाठीच्या याचिकेवरील आगामी सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. या महिलांनी आपल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या १९३७ च्या निकालाचा संदर्भ दिला आहे. १९३७ सालच्या खटल्यामध्ये साक्षीदारांनी सांगितल्यानुसार याआधी वादग्रस्त जागेवर हिंदू देवतांची पूजा केली जायची हे सिद्ध होते, असा दावा या महिलांनी आपल्या याचिकेत केला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम पक्षाची बाजू मांडणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मशीद या संस्थेने महिलांच्या दाव्याचा प्रतिवाद केला आहे. वक्फ बोर्डाची मालकी असलेल्या जागेवरच मशीद बांधण्यात आली आहे, असा निर्णय याआधीच कोर्टाने दिलेला आहे; असा दावा या संस्थेने केला आहे. सध्या हे प्रकरण वाराणसी जलदगती न्यायलयात प्रवर्ग आहे.