अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरण
शिर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करणारा नराधम आरोपी सुनील साळवे याची नाकरे टेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर आरोपीला शिक्षा होण्यासाठी बाजू भक्कम करण्याकरिता पीडित व मृत मुलीची डीएनए चाचणीही केली जाणार आहे
शिर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून साळवे याने तिचा ब्लेडने गळा चिरला. तिच्या पोटावर व गुप्तांगावर वार केले. तिचा खून करून प्रेत साईनगर रेल्वे स्थानकाजवळील काटवनात नेऊन टाकले. कुजलेल्या अवस्थेत मुलीचे प्रेत सापडले. प्रेताची ओळख पटली असून आई-वडिलांनी मुलीला ओळखले. पण मुलीची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे आरोपी साळवे याला शिक्षा होण्यासाठी महत्वाचा पुरावा म्हणून या चाचणीचा अहवाल उपयोगी पडणार आहे.
आरोपी सुनील साळवे हा पप्पू सुरेश साळवे ऊर्फ सुनील भरतसिंग जाधव या नावानेही ओळखला जात होता. नाशिक रोड येथील सिद्धार्थनगर येथील झोपडपट्टीत राहत असताना त्याने ३१ ऑक्टोबर २००३ रोजी सिन्नर शिवारात एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला होता.
 साळवे याला त्यावेळी सारिका साळवे, राज भिकाजी सरदार व त्याची आई विमलबाई भरतसिंग जाधव यांनी प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे खटल्यात त्यांनाही आरोपी करण्यात आले होते. या खटल्यात त्याला न्यायालयाने फाशी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु त्याने उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर त्याची निदरेष मुक्तता झाली. उच्च न्यायालयाचा हा निकाल १३ एप्रिल २०१० रोजी लागला आहे. आता तब्बल दोन वर्षांनंतर या निकालाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
साळवे याने ७ डिसेंबर २००२ रोजी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक आग्रा रस्त्यावर नासडी नदीच्या लगत असलेल्या झोपडपट्टीतील एका नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून तिच्या मानेवर ब्लेडने वार करून खून केला होता. या खटल्यात त्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. तसेच २३ डिसेंबर २००२ रोजी त्याने सहा वर्षांची एक मुलगी शाळेत जात असताना तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिचे शीर धडावेगळे करून प्रेत अर्धवट अवस्थेत टाकून दिले होते. या गुन्’ाातही त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगून तो २८ मे २०१२ रोजी तुरूंगातून बाहेर आला होता.
यापूर्वी साळवे याने  तीन मुलींवर अत्याचार करून हत्या केली. तीनही हत्येत त्याने मुलींच्या मानेवर ब्लेडने वार केलेले आहेत. नुकतेच शिर्डीत त्याने मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मानेवर ब्लेडने वार केले. खटल्यांचे न्यायालयीन कामकाज सुरू असताना त्याने मोठय़ा प्रमाणात पैशांचा वापर केला. हा पैसा त्याच्याकडे कुठून आला याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
मुलीचे कुटुंब शब्दश: रस्त्यावर
 शिर्डीत ज्या मुलीवर हा प्रसंग गुदरला त्या मुलीचे कुटुंब शब्दश: रस्त्यावर आले आहे. पिडीत मुलगी नऊ वर्षांचीच होती. मोलमजुरी करणारे हे कुटुंब अत्यंत गरीब असून ते कालिकानगर झोपडपट्टीत राहतात. ज्या जागेत या कुटुंबाची झोपडी होती ती काही दिवसांपूर्वी मोडण्यात आली. मूळ जागामालकाला तेथे बांधकाम करायचे आहे. अत्याचारीत मुलीच्या आई- वडिलांचा संसार उघडय़ावर आहे. त्यातच मुलीच्या मृत्यूने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाची दु:खे न सरणारी अशी आहेत. ते हलके करण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही. न्यायाची प्रतीक्षा केवळ दैवाच्याच भरवशावर करण्याचा प्रसंग या कुटुंबावर आला आहे.