केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपण भाजपात का गेलो त्याचं कारण आता सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस मागे लागले होते त्यामुळे मी भाजपात गेलो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे हे ३९ वर्षे शिवसेनेत होते. मात्र उद्धव ठाकरेंना कंटाळून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपात आले. आता त्यांनी भाजपात येण्याचं कारण सांगितलं आहे.

सिंदुर्गमधल्या कुडाळमध्ये नारायण राणेंचं भाषण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्याला नारायण राणेंनी संबोधित केलं. माझं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत आहे, हे समजून तुम्ही कामाला लागा असे आवाहन केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप कुडतरकर, रणजीत देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. याच भाषणात नारायण राणे यांनी भाजपात येण्याचं कारणही सांगितलं.

काय म्हणाले नारायण राणे?

“देवेंद्र फडणवीस माझ्या मागेच लागले होते की तुम्ही भाजपात या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीचं की मुलाचं लग्न होतं त्यानंतर मी रस्त्यात चालत असताना फडणवीस मला भेटले मला म्हणाले एक मिनिट जरा बोलायचं होतं. तेव्हा मला त्यांनी रस्त्यातच सांगितलं दादा पक्षात या. मी म्हटलं देवेंद्र तू मला हे रस्त्यावर कसं काय विचारतो. तू मला बोलव आपण चर्चा करु. त्यानंतर आमची चर्चा घेतली. मी भाजपात गेलो. मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असतो. त्यानुसार मी विचार केला आणि त्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.” असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम; बावनकुळे पाठराखण करत म्हणाले, “चांगलं आहे, ते काही…”

नारायण राणे भाजपात आल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा केंद्रात विस्तार झाला तेव्हा त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं. नारायण राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं शत्रुत्व सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांचे ते कट्टर विरोधक आहेत. शिवसेनेत या दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले होते. त्यामुळेच नारायण राणेंनी शिवसेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे मी भाजपात आलो असं आता सिंधुदुर्ग या ठिकाणी बोलत असताना नारायण राणेंनी म्हटलं आहे.