देशात पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी प्रचार करू लागले आहेत. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. तर काही नेते मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवत आहेत. अशातच कणकवलीचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या वडिलांचा (नारायण राणे) प्रचार करू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना अद्याप उमेदवारी दिलेली नाही. त्याआधीच त्यांनी आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे भाजपाच्या संवाद मेळाव्यात सिंधुदुर्गमधील वेगवेगळ्या गावच्या सरपंचांना संबोधित केलं यावेळी राणे यांनी सरपंचांना मतांसाठी सज्जड दम दिला. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच राणेंच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.

नितेश राणे संवाद मेळाव्यात सरपंचांना म्हणाले होते, ही निवडणूक आपली आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने यंत्रणा राबवायची आहे. तुम्हाला तुमच्या निवडणुकीत जेवढं मतदान मिळालं होतं, तेवढं किंवा त्यापेक्षा जास्तच मतदान मला हवं आहे. त्यापेक्षा एक टक्कादेखील कमी मतदान मिळालं तर मला ते चालणार नाही. मी ४ जून रोजी सर्वांचा हिशेब घेऊनच बसणार आहे. कारण त्यानंतर तुम्हाला आमदारांकडे निधी मागायला यायचं आहे. ४ जूनला आम्हाला हवं तसं लीड मिळालं नाही आणि त्यानंतर तुम्हाला हवा असलेला निधी वेळेत मिळाला नाही तर तुम्ही तक्रार करायची नाही.

नितेश राणे यांनी सरपंचांना दम दिल्यानंतर यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे नितेश राणे यांची पाठराखण करत म्हणाले, चांगलं आहे, ते काही अमिष दाखवत नाहीत. त्यांनी केवळ विकासाचा प्रश्न मांडलाय. आम्ही काही सन्यासी नाही आहोत. त्यांचं (नितेश राणे) वक्तव्य आम्हाला मान्यच आहे. आम्ही भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. सहाजिकच आम्हाला वाटतं की, आम्ही समाजासाठी एवढं काम करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण आयुष्य देशाला, समाजाला आणि जनतेला दिलं आहे, त्यामुळे सहाजिकच आम्हाला वाटतं की अमुक गावातून आम्हाला मतं मिळायला हवीत.

हे ही वाचा >> धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही जे काही करतो ते शेवटी मतांसाठीच करतो ना? आमची कामं मतांसाठीच असतात. लोकशाहीत सर्वजण त्यासाठीच झटत असतात. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो ते केवळ चार मंत आम्हाला मिळावी यासाठीच. चार मतांसाठी त्यांनी (नितेश राणे) घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे. ते जे काही म्हणाले ते खरं आहे. जे गाव आमच्या पाठिशी आहे त्या गावाला निधी दिलाच पाहिजे. ज्यांनी मत दिलं नाही त्यांनाही निधी दिला पाहिजे. ज्यांनी मत दिलं त्यांचे आभार, ज्यांनी नाही दिलं त्यांचेही आभार. ज्यांनी मत दिलं त्यांची कामं आम्ही करू, ज्यांनी दिली नाहीत त्यांची कामंदेखील करू.