महाराष्ट्रातील सध्याचे सरकार यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीनेच कारभार करत असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. 'मुख्यमंत्र्यांचे विधान हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे,' असे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज ३३ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांनी कराड येथील 'प्रीतीसंगम' या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 'महाराष्ट्रातील सामान्य माणसासाठी यशवंतराव चव्हाण यांनी जे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम सध्याच्या सरकारकडून सुरु आहे,' असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याची शरद पवारांनी खिल्ली उडवली. 'चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या विचाराने सध्याचे सरकार काम करत आहे, हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे,' असा टोला पवार यांनी लगावला. 'मुख्यमंत्री ज्या विचारधारेतून आले आहेत, त्या विचारधारेच्या जवळपाससुद्धा जाण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आजचे विधान हा मोठा विरोधाभास आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यशवंतरावांना अभिवादन करायला तिथे गेले, याचा आनंद आहे. मात्र चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या विचारांवर सध्याचे सरकार चालले आहे, हे वक्तव्य यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे,' असे पवार यांनी म्हटले.