सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी हे मुलाच्या शाही विवाहामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्य दुष्काळात होरपळत असतांना राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्या घरातील शाही विवाह वादग्रस्त बनले असतांना आता त्यामध्ये नायकवडी यांच्या पुत्राच्या विवाहाची भर पडली आहे.
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाचा-कन्येचा विवाह, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांच्या पुतण्याचा विवाह व चिंचवडचे राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या लक्षभोजनावळीने सामान्यांचे लक्ष वेधून घेतले असतानाच सांगलीच्या महापौरांच्या मुलाचा शाही विवाह प्रकाशझोतात आला आहे.
सांगली जिल्ह्य़ामध्ये दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे. चारा छावण्यांमध्ये जनावरांनाही चारा मिळत नसल्याची स्थिती असतांना महापौर इद्रीस नायकवडी यांनी मुलांच्या लग्नाचा बार दणक्यात उडविलाआहे. मिरज हायस्कूलच्या पटांगणात अजहर नायकवडी याच्या विवाहास मंत्री, आमदार, सामान्य जनतेनेही प्रचंड गर्दी केली होती. नायकवडी यांनी मंचाची सजावट, विद्युत रोषणाई यामध्ये कसलीही कमतरता सोडलेली नव्हती. चिकन, मटण यांची बिर्याणी हजारो लोकांना पुरविण्यात आली. शिवाय बिसलेरी पाण्याची सोयही केली होती. महापौर परिषद सांगलीत असल्याने राज्यातून आलेल्या महापौरांनाही या शाही शादीचा डामडौल अनुभवता आला. लाखो रूपयांची उधळपट्टी या विवाहासाठी करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाही विवाहांवर उघडपणे टीका केली असतांनाही त्यांचे हेविधान त्यांचेच कार्यकर्ते कितपत गांभीर्याने घेतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.    
हा पाहुणचाराचाच प्रकार-नायकवडी
आपला घरचा गोतावळा, मित्र परिवार, नातेवाईक, कार्यकर्तेया सर्वाना सामावून घेण्याच्या उद्देशाने लग्न करण्यात आले. मात्र हा शाही विवाह नव्हता तर विवाहासाठीआलेल्या निमंत्रकांना शाकाहारी-मांसाहारी जेवण देणे गैर नव्हे तो पाहुणचाराचाच प्रकार आहे. गेल्या वीसवर्षांत आमच्या कुटुंबात लग्न झाले नसल्याने पुत्राचा विवाह सर्व भाऊबंदांनी एकत्रित केला. त्याला मित्रानींही साथ दिली. लग्न करतांना पैशाची उधळपट्टी न करता शक्य तितकी काटकसर केली आहे,असे  महापौर इद्रीस नायकवडी यांनी सांगितले आहे.
 शेट्टींची पवारांवर टीका
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या पुत्राच्या शाही विवाहाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे शरद पवार हे वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या घरच्या लग्नाला कसे गेले होते, असा प्रश्न उपस्थित करून खासदार राजू शेट्टी यांनी पवार हे शाही विवाहाबद्दल पक्षपाती वागत असल्याची टीका केली.