शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. या निमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या दोघांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच, आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद देखील साधणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्ताव उद्धव ठाकरे हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. तर, नुकत्याच झालेल्या पंचायत समितींच्या निवडणुकीनंतर आणि राज्यातील एकूण परिस्थितीवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे दोघे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस अभिवादन करतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, या फोटो सोबत काही मजकूरही लिहिला असून यातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले.. आज संध्याकाळी उद्धवजी शिवसैनकांशी संवाद साधतील. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विरोधकांनी राजभवनाच्या मुख्य दारात थांबून उद्धवजीचे भाषण ऐकावे.” असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बेताल माकडचेष्टा पाहून…; संजय राऊतांचं रोखठोक तसेच,“बाळासाहेब ठाकरे आज शिवतीर्थावर विसावले आहेत. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या हयातीत हा दिवस आनंदाचा उत्सव ठरत असे. संध्याकाळच्या सभेत ते भाषणाला उभे राहात. व्यासपीठावर त्यांचा स्वभाव गंभीर व उग्र वाटे (प्रत्यक्षात ते तसे नव्हते). त्यांच्या शुभ्र कपड्यांत, खांद्यावरील शालीत साधेपणा होता, तितकाच रुबाब होता. महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी काय केले, काय सोसले हे रोज सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ या नावातच त्यांचा त्याग व संघर्ष सामावलेला आहे. आज देशातील अनेक नेत्यांकडे, राजकारण्यांकडे पाहतो तेव्हा वाटते, महाराष्ट्रात काय, तर देशातही बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा पुरुष निर्माण व्हायचा आहे,” असं संजय राऊत यांनी आज शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधील रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे.