राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत ३२ वा क्रमांक लागला. ही माहिती समोर आल्यानंतर भाजपा नेत्या आणि धनंजय मुंडेंची बहीण पंकजा मुंडेंनी भर सभेत धनंजय यांना टोला लगावला. “मी मंत्रीपदी होते तेव्हा पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. थेट ३२व्या क्रमांकापर्यंत माझं मंत्रीपद कधीच गेलं नाही,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर तोंडसुख घेतलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“जेव्हा तुम्ही २०१९मध्ये निवडणूक लढवली तेव्हा तुम्ही ग्रामविकास मंत्री होत्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या, तरीही परळीच्या जनतेनं तुम्हाला तुमची औकात दाखवून दिली. २०१९चा पराभव तुम्ही विसरलात का?, परळीच्या जनतेनं २०१९मध्ये तुम्हाला औकात दाखवली ते विसरलात का,” अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे</strong>?

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर परखड टीका केली. “तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये होत्या. असं ३२ व्या नंबरवर मी कधीच गेले नाही,” असं त्या म्हणाल्या.  याशिवाय जिल्ह्यासाठी मिळवलेल्या निधीवरूनही पंकजांनी निशाणा साधला. “निवडणुकीत निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं होतं. एक नव्हे तर पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. एका झटक्यात ५०० कोटी रुपये द्यायला तयार होतात, पण दोन वर्ष उलटूनही निधी मिळाला नाही. मग दोन वर्षे काय टाळं पिटत होते का? असा सवाल करत ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही,” असा टोला पंकजांनी लगावला.