साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरापासून रद्द केलेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघाली ती पुरोगामी चळवळीतील आणि राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने. मिरजोळी येथून निघालेली ग्रंथदिंडी संमेलनाच्या मंडपात आली तेव्हा नियोजित संमेलनाध्क्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या परिवर्तन दिंडीचे केवळ स्वागतच केले नाही, तर या दिंडीचे भोई होऊन त्यांनी हमीद दलवाई यांचा सन्मानच केला.
स्थानिक मुस्लीम संघटनेने विरोध केल्यामुळे साहित्य संमेलनाची नियोजित ग्रंथदिंडी जी हमीद दलवाई यांच्या घरापासून निघणार होती ती निमंत्रक संस्थेने रद्द केली. त्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांच्या नेतृत्वाखाली समांतर ग्रंथदिंडी काढून या घटनेचा विधायक पद्धतीने निषेध केला. ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम, सुगावा प्रकाशनचे प्रा. विलास वाघ, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, राष्ट्र सेवा दलाच्या चिपळूणच्या अध्यक्षा शकुंतला लढ्ढा, पुष्पा लढ्ढा, पत्रकार युवराज मोहिते, राजन इंदूलकर, सुषमा इंदूलकर, अभिजित हेगशेटय़े, सुनीता गांधी आणि कविता गजमल यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘मराठी साहित्याचे दूत फुले-आंबेडकर- केशवसूत’ ‘परिवर्तनवादी साहित्याचा विजय असो,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
ठीक सव्वा अकरा वाजता ही समांतर दिंडी संमेलनाच्या मंडपात पोहोचली तेव्हा नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या परिवर्तन दिंडीचे स्वागत केले. ही दिंडी काही वेळ आपल्या खांद्यावर घेत ते या पालखीचे भोई झाले. संमेलनाच्या संयोजकांनी केलेली चूक आम्ही पुरोगामी कार्यकर्त्यांनी सुधारली असून हमीद दलवाई यांचा सन्मान केला, अशी भावना अन्वर राजन यांनी व्यक्त केली.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले,‘‘हमीद दलवाई हे मराठीतील मोठे लेखक आहेत. ते केवळ कथाकार आणि कादंबरीकार नाहीत, तर भारतीय पातळीवरील तत्त्वचिंतक होते. संमेलनाच्या संयोजन समितीने ग्रंथदिंडी रद्द केल्याने चूक झाली का, याची चर्चा करण्यापेक्षा, ही ग्रंथदिंडी निघणे महत्त्वाचे होते. त्यामुळे या गंथदिंडीचे मी स्वागत करतो.’’
साहित्य न वाचताच झालेला विरोध चुकीचा – मेहरुन्निसा दलवाई
मेहरुन्निसा दलवाई म्हणाल्या,‘‘ हमीद दलवाई हे आधी माणूस होते. भारतीय होते. मग मुसलमान होते. ते नास्तिक होते, याकडे लक्ष देण्याची गरज नाही; तर त्यांनी लिहिलेले साहित्य हे अधिक महत्त्वाचे आहे. हे साहित्य न वाचता या ग्रंथदिंडीला झालेला विरोध चुकीचा आहे. त्यामुळेच ही परिवर्तनवादी ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे.’’