यात्रोत्सवातील बंदोबस्त, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, महामार्गावर घडणाऱ्या अपघाताप्रसंगी सहाय्य, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन प्रसंगात मदत आदिंसाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय पुढाकार घेत असल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण काहीअंशी हलका होण्यास हातभार लागला आहे. ग्रामीण भागात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावोगावी स्थापन झालेल्या ग्रामसुरक्षा दलांचे महत्व, या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे.
गाव पातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपक्रम राबविणे, असे तंटामुक्त गाव मोहिमेचे स्वरूप आहे. त्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करणे अंतर्भूत आहे. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सहाव्या वर्षांत वर्षांत म्हणजेच २०१२-१३ मध्ये नाशिक परिक्षेत्रात एकूण ४,२०१ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करणे, ही प्रामुख्याने या दलाची जबाबदारी. त्याकरिता दलाच्या सदस्यांकडून गस्त घातली जाते. या माध्यमातून स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेची फळी उभारली गेल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण काहिसा हलका झाला. पोलीस ठाण्यांकडून दलाच्या सदस्यांना खास प्रशिक्षण व गणवेशही उपलब्ध करून दिला जातो. गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अतिरिक्त बळ उपलब्ध झाले.
याच बरोबर वेगवेगळ्या प्रसंगी वा घटनांमध्ये हे दल स्थानिक पातळीवर सक्रियपणे कार्यरत होत असल्याचे दिसून येते.
उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग देवीच्या यात्रोत्सवात कळवण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामरक्षक दल महत्वपूर्ण भूमिका निभावतात. दरवर्षी चैत्रोत्सव व शारदीय नवरात्रोत्सव या यात्रोत्सवादरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी सप्तशृंग गडावर दाखल होतात. यावेळी भाविकांना दर्शनासाठी टप्प्याटप्प्याने सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. या कामात आसपासच्या गावातील ग्रामरक्षक दलांची मदत घेण्यात येत असल्याची माहिती कळवण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
काही वर्षांपूर्वी सप्तशृंग गडावरील घाटातून भाविकांची बस रात्रीच्या सुमारास दरीत कोसळली होती. त्या अपघातात ४० हून अधिक भाविक ठार झाले होते. डोंगर-दऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या बसमधून मृत व जखमी भाविकांना बाहेर काढण्यात ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी रात्रभर धावपळ केली होती.
महामार्गावर घडणाऱ्या अपघाताप्रसंगी दलातील सदस्य धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करतात. वणी टॅक्सी चालक-मालक संघटनेकडून विनामूल्य जखमींची वाहतूक केली जाते. आपत्कालीन प्रसंगात ग्रामसुरक्षा दल व ग्रामस्थ स्वत:हून मदतीसाठी पुढे येत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.