वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर काम करणारे जितेंद्र भालेराव (वय ३८) यांचा सोमवारी सकाळी करोना मुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे वसईतील पोलिसांच्या मृत्यूची संख्या दोन झाली आहे.

पोलीस नाईक जितेंद्र भालेराव हे वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 20 जून रोजी त्यांना करणाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नालासोपारा येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. याच पोलीस ठाण्यातील किरण साळुंके या पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मागील महिन्यात करोनामुळे मृत्यू झाला होता.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 135 पोलिसांना  करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 103 जण करोनामुक्त झाले आहे. तर 30 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन पोलीस कोरनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.