सांगली : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना अखंडित आठ तास वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन केल्याने सुमारे साडेतीन लाख ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचे महावितरणने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. मात्र आकस्मिक स्थितीत भारव्यवस्थापनाची गरज भासल्यास कृषी वीज पुरवठय़ाच्या नियोजित वेळापत्रकाच्या आठ तासातील सुरुवातीस किंवा शेवटास काही अवधीकरिता वीज बंद करून उर्वरित कालावधीत अखंडितपणे, सलग वीज पुरवठा केला जाईल. यामुळे कृषी ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. भारव्यवस्थापनाची परिस्थिती ओढवू नये, यासाठी महावितरण शर्थीचे प्रयत्न करीत आहे. तरी कृषिग्राहकांनी सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे. राज्यभर वाढता उष्मा, देशभरातील कोळसा टंचाई , वीज निर्मिती संचाची देखभाल दुरुस्ती या पार्श्वभूमीवर विजेची वाढती मागणी व अपुरा वीज पुरवठा यात समतोल साधून वीज यंत्रणा कोलमडू नये या हेतूने, एकीकडे अत्यावश्यक प्रसंगी आपत्कालीन भारव्यवस्थापनाचा उपाय महावितरणकडून अवलंबला जातो आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी महावितरणने मुख्यालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. राज्यातील परिस्थितीवर हा कक्ष बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हास्तरावर हे नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. भारव्यवस्थापन करताना अधिक वीज गळती व वसुलीचे प्रमाण कमी असलेल्या भागातील वीज वाहिन्यांवर आवश्यकतेनुसार भार नियंत्रण करण्यासाठी नाईलाजास्तव अर्धा ते दीड तास वीज बंद केली जाते आहे. वीज गळती व वसुली प्रमाणाधारे ११ के व्ही वीज वाहिन्यांचे ए,बी, सी, डी, ई,एफ, जी१, जी२, जी ३ असे विभाजन केले आहे. सध्या आपत्कालीन भारव्यवस्थापन ई, एफ,जी१,जी२,जी३ या गटात जिथे वीज हानी ५० टक्केहून अधिक आहे. कोल्हापूर, सांगलीतील बहुतांश भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले असून वीजहानीही कमी आहे.