आपल्या विविध प्रलंबित मगण्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या परिचारिकांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर परिचारिका उपोषणाला बसल्या आहेत. या परिचारिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र जिल्हा परिषद नस्रेस संघटना रायगड शाखेच्या अध्यक्षा अनिता अनंत पाटील-नेने, सरचिटणीस विजया विजय पाटील-भोसले, प्रीतम गावडे, निशा कावजी, वैशाली पाटील या पाच परिचारिका उपोषणाला बसल्या आहेत. मासिक वेतन पाच तारखेच्या आत द्यावे.
दुर्गम ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीवर परिचारिकांचे एक किंवा दोन प्रतिनिधी घ्यावेत. सन २००१च्या लोकसंख्येवर अधारित बृहत आराखडय़ानुसार नियोजन करण्यात यावे. ए.एन.एम.ना एल.एच.व्ही.ची पदोन्नती द्यावी. सेवाज्येष्ठता याद्या अद्ययावत कराव्यात. उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व परिचारिकांना अ प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे. रात्रपाळीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी सोबत असणे बंधनकारक करावे. उपकेंद्रातील कामाचे समान वाटप करावे. सेवानिवृत्त परिचारिकांना त्यांचे निवृत्तिवेतन वेळेत द्यावे. अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा. उत्कृष्ट सेवा करणाऱ्या परिचारिकांना परिचारिकादिनी जिल्हा परिषदेमार्फत सन्मानित करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा संघटनेशी चर्चा करावी, या मगण्यांसाठी परिचारिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.