राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत राज्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. दरम्यान, आज शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांचा विरोध पाहता त्यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांनी आज (शुक्रवार, ५ मे) मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "उत्तराधिकारी निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी काम करेन." ५६ वर्ष राजकारणात सक्रीय असून आणि २४ वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष असून या काळात तुम्ही तुमच्यासाठी बॅकअप (उत्तराधिकारी) तयार करू शकला नाहीत, याकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न शरद पवार यांना विचारल्यावर पवार म्हणाले. इथे माझ्याजवळ बसलेले सर्वजण हा माझा बॅकअपच आहे. ही सर्व मंडळी माझा बॅकअप आहेत. ही मंडळी राज्य चालवू शकतात, इतकंच काय देशही चालवू शकतात. या सर्वांना संधी मिळावी म्हणून तर मी मागे जाणार होतो. पण यांनी एकलं नाही, मी यावर काय करू? हे ही वाचा >> “…तर आमचा पक्ष पहिल्या क्रमांकावर असता”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाले, “आमच्या मागून आलेला…” पवारांचं हे उत्तर ऐकल्यानंतर एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला, किती दिवसात तुम्ही तुमचा उत्तराधिकारी तयार कराल? यावर शरद पवार म्हणाले, उत्तराधिकारी वगैरे असं काही राजकीय पक्षात नसतं. असं ठरवलं जात नाही. पक्षात काही जागा रिक्त होतात, त्या जागांचं काय करायचं, त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करायची याबाबतचा निर्णय सहकारी घेतात. मुळात राजकारणात एखाद्या व्यक्तीचा उत्तराधिकारी असू शकत नाही. उत्तराधिकारी अशी संकल्पनाच नसते.