राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं आज एक पाऊल टाकलं आहे. समान कार्यक्रम ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय-धोरणं आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला. समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून, फक्त तिन्ही पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटायची औपचारिकता राहिली आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील महाशिव आघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. याबैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे उपस्थित होते. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला आहे. या बैठकीनंतर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आम्ही काही मुद्यांवर चर्चा केली आहे. मसुदा तयार करण्यात आला असून, लवकरच तो काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच तो माध्यमांसमोर उघड केला जाईल. राज्यात लवकर सरकार स्थापन व्हावं अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळं सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी लवकर निर्णय घेतला, तर लवकरच सत्ता स्थापन करण्यात काहीही अडचण येणार नाही, असं सांगत वडेट्टीवार यांनी काही सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाची काँग्रेसची मागणी नाही

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात आहे, हे वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले. “अशी कोणतीही मागणी काँग्रेसनं केलेली नाही. सत्तेतील सहभाग हा विषय नसून सत्ता स्थापन करणं महत्त्वाचं आहे. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर चालवणं हे महत्त्वाचं आहे. समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर सत्तेचा पेच सुटेल,” असं वडेट्टीवार म्हणाले.