वेदान्त प्रकल्पावरुन राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे. “आपले ठेवायचे झाकून…” असे म्हणत सावंत यांनी राफेल विमान खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे. “सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या आणि पावन व्हा, असा लाँड्रीचा धंदा तुम्ही सुरू केला आहे” असा आरोप सावंत यांनी भाजपावर केला आहे. भ्रष्टाचारावर बोलण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार आहे का? असा सवालही सावंत यांनी केला आहे. “ते दोघंच कित्येक दिवस मंत्रिमंडळात होते, तेव्हा…”, अजित पवारांचा वेदान्त प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना सवाल! “शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणारे सरकार आहे. मराठी माणसाच्या मुळावर उठलेले हे सरकार असंवैधानिक पद्धतीने बनले आहे. अनैतिकता शरिरात भिनली असल्याने हे लोक खोटे सहजासहजी बोलतात” असे ट्वीट करत सावंत यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकासआघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. वेदान्त प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होण्याचा निर्णय आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच झाला होता. हा प्रकल्प राज्यात यावा, यासाठी आम्ही निकराचे प्रयत्न केले. मात्र, यासाठी ज्यांनी काहीच केले नाही, ते आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत”, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. Vedanta-Foxconn shift : “गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही; पण पुढील दोन वर्षांत…”; देवेंद्र फडणवीसाचं विधान! दरम्यान, काँग्रेसच्या सत्ताकाळात २ जी, ३ जी व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा भ्रम भाजपाने निर्माण केला होता, असा आरोपही अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. विमान आणि संरक्षण क्षेत्रात ज्यांनी काम केले नाही, त्यांना नागपुरात हजारो एकर जमीन दिली गेली. याबाबत चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.