शिवसेनेमध्ये जे काही सुरु आहे त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही असा दावा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! असा सल्लाही दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता शिगेला आहे असा दावा करतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार-नामदार परत येतील असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केलाय. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल, असा टोलाही शिवसेनेनं लागवला आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं?

आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपाने तरी करू नये
“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपाच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपाने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपाचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजपा सरकारचीच कृपा नाही काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं भाजपाला विचारला आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

आता किरीट सोमय्यांना…
“आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, ‘‘आता तुमची जागा तुरुंगात’’ असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपाच्या गोटात शिरले आहेत व दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते. नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले व त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले,” असा उल्लेख लेखात आहे.

नक्की वाचा >> ठाकरे सरकार भ्रष्टाचारी, अडीच वर्षांपासून त्यांच्यामुळे…; एकनाथ शिंदेंसोबतच्या ३४ शिवसेना आमदारांचा धक्कादायक दावा

त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार पुन्हा स्वगृही परत येतील
“भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजपा कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे ‘वेगळा गट’ करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील,” असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

शिवसैनिकांनी ठरवले तर हे…
“आज जे भाजपावाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपाची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष,” असा टोला शिवसेनेनं भाजपाचा थेट उल्लेख न करता लागवला आहे.
“राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपाच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!,” असा सल्ला शिवसेनेनं बंडखोर आमदारांबरोबरच विरोधकांना दिला आहे.