राज्याचे माजी मंत्री व महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते बाबासाहेब केदार यांचे आज पहाटे १ वाजता ऑरेंज सिटी इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लीलाबाई, सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह दोन पुत्र आणि दोन कन्या तसेच बराच मोठा आप्तपरिवार आणि चाहते आहेत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विदर्भातील सहकाराची चळवळ सुदृढ करण्यात बाबासाहेबांचे अख्खे आयुष्य गेले. सूतगिरण्या, तेल गिरण्या, दुग्ध कारखाने, कृषी पणन बाजार समित्या, कृषी औद्योगिक चळवळ, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी अशा वेगवेगळ्या आघाडय़ांवर बाबासाहेबांनी संघर्ष करून सहकाराला संजीवनी दिली. छत्रपाल ऊर्फ बाबासाहेब केदार यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२८ रोजी पाटणसावंगी येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विद्यार्थी दशेपासून त्यांचा काँग्रेसशी संपर्क आला. विद्यार्थी चळवळीत कार्यरत असतानाच त्यांनी राजकारणात उडी घेतली. दादासाहेब कन्नमवार यांच्याशी भेट झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणाची सूत्रे  तब्बल १३ वर्षे बाबासाहेबांच्या हाती राहिली.
राजकारणात घट्ट पावले रोवतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील काम सुरू केले. सावनेर तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करून त्यांनी विदर्भातील सहकार क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला. साधारण १९६५ पासून ते सहकार क्षेत्रात सक्रिय झाले. जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करून सावनेर आणि बेला येथे तेल गिरणी प्रकल्प त्यांनीच सुरू केले. रामटेक, मौदा, भिवापूर या भागात भात शेतीक्षेत्रात लक्ष घालून त्यांनी सहकारी भात गिरणी सुरू केली. पाटणसावंगीत खांडसरी साखर कारखाना, पारशिवनी येथे जिंनिंग सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटचे बांधकाम त्यांच्याच काळात झाले. महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी महासंघाचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय करण्यासाठी अनेक माध्यमिक शाळा सुरू केल्या. नागपूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करून जिल्ह्य़ातील दूध उत्पादनांच्या विक्रीचे माध्यम त्यांनी सुरू करून दिले. कळमना येथे मार्केट यार्ड उभारणीचा प्रस्तावही त्यांच्याच काळातील आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद भूषविले. बाजारपेठा आणि सहकाराच्या अभ्यासासाठी त्यांनी अनेक देशांचे दौरे केले.