शहरातील सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने शनिवारी सातव्या ‘तत्त्व’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
तत्त्व या उपक्रमाव्दारे औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद साधण्यात येतो. विविध उद्योगातील तज्ज्ञ तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, मनुष्यबळ आणि या सर्वाच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे कामात अधिकाधिक गुणवत्ता कशा प्रकारे प्रत्यक्षात आणतात हे जाणून घेता येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थी संबंधित तज्ज्ञांशी थेट संवाद साधू शकतात. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करून त्यांचे काम करतानाचे प्रत्यक्षातील अनुभव जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. यंदाच्या परिसंवादात ‘स्थिर उद्योगांसाठीचे धोरण’ हा विषय निवडण्यात आला आहे. त्या अंतर्गत प्रामुख्याने व्यवस्थापन, विपणन, वित्त सहाय्य, मनुष्यबळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांना अत्युच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी या उपक्रमाची अनोखी संकल्पना संस्थेने प्रत्यक्षात आणली आहे.
प्रत्येक उद्योगाची योजना, रणनिती व स्पर्धेत टिकण्यासाठी कुशल व्यवस्थापन अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने यशस्वी उद्योगांच्या व्यवस्थापनातील वेगवेगळे पैलू जाणून घेण्याकरिता हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, थायसन ग्रुप आदी उद्योगांमधील व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यंदाची परिषद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून त्यात २०० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.