महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आणि कोकण रेल्वे यांच्या प्रतिसादाअभावी कोकण, सिंधुदुर्गच्या पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कोकणात घरोघरी पर्यटनाची संकल्पना रुजविल्यास त्याचा फायदा होईल, असा विश्वास द्वारका कृष्ण सहकारी पर्यटन संस्था अध्यक्ष डी. के. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येत्या ९ फेब्रुवारी रोजी डी. के. टुरिझम येथे लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांची एक पर्यटन परिषद आयोजित केली आहे. त्यात पर्यटन, पायाभूत सुविधा, अपघात सुरक्षितता अशा मुद्दय़ांवर उहापोह होणार आहे, असे श्री. सावंत म्हणाले.
या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती अधिकारी सतिश पाटणकर, कोकण पर्यटन संस्थेचे डॉ. बाळासाहेब परुळेकर, अशोक देसाई, दीनानाथ बांदेकर, संजय कानसे, भाई देऊलकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची धोरणे पर्यटन जिल्ह्य़ाच्या विकासाआड येत आहेत. त्याकडे आम्ही वेळोवेळी लक्ष वेधूनही कानाडोळा केला जात आहे. पर्यटन महामंडळाने खास योजना आणण्याची गरज असताना तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे श्री. सावंत म्हणाले.
पर्यटन महामंडळाची निवास-न्याहारी योजना अंमलबजावणी योग्य नाही. डिंगणे -मामाचे गाव किंवा चौकुळ थंड हवेचे ठिकाणात पर्यटकांची रहदारी वाढली आहे. तसेच आणखी काही गावं मामाच्या गावासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवित आहेत. पण त्यासाठी पर्यटन महामंडळ व शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे डी. के. सावंत म्हणाले.
पर्यटनासाठी कोकण रेल्वे फारच महत्त्वाची आहे. कोकण रेल्वेच्या स्वत:च्या रॅक कमीच आहे. मांडवी, दिवा या गाडय़ांसाठी रॅक आहेत. बाकी सर्व भाडय़ाच्या किंवा भारतीय रेल्वेच्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाडय़ांना सिंधुदुर्गात थांबा हवा, तसेच रातराणीच्या डब्यात वाढ करून दिवा ठाण्यापर्यंत नेण्याची गरज डी. के. सावंत यांनी व्यक्त केली.
या वेळी कोकण पर्यटन संघटनेचे संचालक बाळासाहेब परुळेकर म्हणाले की, कोकणच्या पर्यटनासाठी झटणाऱ्यांना शासनाने किंवा पर्यटन महामंडळाने विश्वासात घ्यायला हवे. त्याचा अभाव जाणवतो. केरळ राज्यापेक्षा सिंधुदुर्ग, कोकणला सर्वसंपन्न वैभव आहे. त्यामुळे सर्वागीण विकास पर्यटनाच्या माध्यमातून शक्य आहे. घरोघरी पर्यटनाला वाव आहे. कोकणपण टिकवून पर्यटन कायम हवे, असे श्री. परुळेकर म्हणाले.
चौकुळगाव पर्यटकांचे स्वागत करत आहे. तसेच कृषी पर्यटनासाठी आम्ही चळवळ उभारत आहोत. केरळ व गोवा राज्यात जाणारे पर्यटक कोकण, सिंधुदुर्गात कसे वळतील याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देत आहोत, असे सांगताना बाळासाहेब परुळेकर म्हणाले की, घरोघरी पर्यटन करणाऱ्यांना बँकांचे कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत, असे श्री. परुळेकर म्हणाले.
सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेले आणि तेच तेच खाऊन चव बदलण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपण दैनंदिनी कोकणी पद्धतीचे रुचकर जेवण देतो, तेच आदरातिथ्य जास्त आवडते, ते देण्याचे काम घरोघरी निर्माण होणाऱ्या पर्यटनातून करण्यासाठी आपला भर आहे, असे डी. के. सावंत व बाळासाहेब परुळेकर म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती अधिकारी असलो तरी सावंतवाडीचा सुपुत्र या नात्याने कोकण रेल्वे प्रवासी प्रश्नावर संधी मिळेल तसे प्रयत्न करत आहे, असे सतीश पाटणकर म्हणाले. कोकण रेल्वेच्या रुळावरून धावणाऱ्या प्रत्येक गाडीला सिंधुदुर्गात थांबा मिळावा असा माझा आग्रह असतो, असे श्री. पाटणकर म्हणाले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहिती विभागात असल्यापासून अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिले आहेत, त्याचा फायदा झाला, असे सतीश पाटणकर म्हणाले.