तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतजमिनींचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागण्या घेऊन आज शुक्रवारी सकाळी शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीने भिवंडी-वाडा राज्य महामार्गावर शिरीषपाडा नाक्यावर दीड तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
तालुक्यातील रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचाही मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. जमिनीचा योग्य मोबदला तातडीने मिळावा, तसेच ठाणे जिल्हा परिषदेकडून अत्यल्प निधी ठाणे पूर्व विभागाला देऊन केलेला अन्याय दूर करावा या मागण्या घेऊन हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी या वेळी सांगितले. येत्या १५ दिवसांत आपल्या मागण्यांसदर्भात आपल्या शिष्ठमंडळासह बैठक घेऊन त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, पंचायत समितीचे सदस्य नीलेश गंधे, जिल्हा परिषद सदस्या दिव्या म्हसकर, शहरप्रमुख प्रकाश किणे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, नायब तहसीलदार बाबासाहेब अंघोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हजर होते.