Uddhav Thackeray Interview Today : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होतेय. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते असाही प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेतील विश्वासघाताच्या राजकारणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही पक्ष व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे, माँ यांनी आम्हाला पक्षातील नेत्यांना कुटुंब म्हणून पाहायला शिकवलं. एकदा आपलं म्हटलं की आपलं. त्यामुळे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही अंधविश्वास टाकतो, ताकद देतो आणि राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते.”

हेही वाचा – खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

“२०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं?”

“आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं? आजही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. तेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. तेव्हा अनेकांना वाटलं शिवसेना आता संपेल. मात्र, शिवेसना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आले,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा – भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

“माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती”

उद्धव ठाकरे म्हणाले, “तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी सकाळी जाग आल्यावर आळस देण्याचा प्रयत्न केला आणि अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती.”

हेही वाचा -“शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा डाव आहे”; फडणवीसांसंदर्भातील त्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा आरोप

“मला श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं”

“मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये (Golden hour) ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

पाहा मुलाखत –

“तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं.”

हेही वाचा : ठाकरे विरुद्ध शिंदे : निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या ‘त्या’ निर्देशांविरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

“माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या”

“पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.