लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लवकरच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात बैठका सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळत नसल्याची चर्चा आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप नेमके कुठे अडले? याबाबतची माहिती पत्राद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना कळवली. मात्र, यानंतरही काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. या सर्व घाडामोडींवर आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. "प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी कॉंग्रेस 'मोहब्बत'चे दुकान कधी उघडणार?", असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर विजय वडेट्टीवार यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिले. विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले? "प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी तुम्ही मोहब्बतचे दुकान कधी उघडणार आहात"? यावर वडेट्टीवार म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आम्ही सर्वजण पाईक आहोत. या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत असे संविधान दिले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर मोहब्बतच असणार आहे. आमचे (कॉंग्रेसचे) मोहब्बतचे दुकान कायमच आहे. यावर मार्ग नक्कीच निघेल", असे वडेट्टीवार म्हणाले. "महाविकास आघाडीच्या जागावाटपावर लवकरच मार्ग निघेल. पण काल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मोदींची गाडी सुसाट चालली आहे', आता सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार आहे, म्हणजे सुसाट चाललेल्या गाडीवर नियंत्रण नसते ना? आमची गाडी हळूहळू चालते, त्यामुळे गाडीही आणि गाडीतून प्रवास करणारे प्रवासीही सुरक्षित राहतील, म्हणून प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर आहेत", असे वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश आंबेडकरांच्या पत्रावर वडेट्टीवार काय म्हणाले? प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्राचा अर्थ ते काँग्रेसबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहेत, असा होतो. प्रकाश आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली, याबाबत वडेट्टीवार म्हणाले, "आमची बोलणी सुरू आहे. पण प्रकाश आंबेडकर काय बोलले, ते मी पूर्ण ऐकले नाही. ना ते पत्रही मी पूर्ण वाचले आहे. त्यामुळे तो माझा अधिकार नाही. त्यावर काँग्रेस हायकमांड त्यांच्याशी बोलतील", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांना मुंबईच्या सभेचे निमंत्रण आहे का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा आज (१२ मार्च ) महाराष्ट्रात पोहोचली. नंदुरबार जिल्ह्यात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. ही यात्रा १६ मार्चला मुंबईत पोहोचणार आहे. तर १७ मार्चला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे. या सभेचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे का? असा प्रश्न विचारला गेला. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीकडून निरोप दिला जाणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणे सुरु आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.