राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने पंख छाटून अवमानित केले जात असल्याने कमालीचे अस्वस्थ झालेले पक्षाचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे पुढील राजकीय निर्णय न घेता ‘शांत’च आहेत. ही वादळापूर्वीची शांतता म्हणायची की अगतिकता आहे, हे समजत नाही. एकेकाळी राज्यात दबदबा निर्माण करणारे मोहिते-पाटील हे आता स्वत:च्या सोलापूर जिल्हय़ाच्या राजकारणातही पार पिछाडीवर गेले आहेत. सततच्या पराभवामुळे आता या गटाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ मोहिते-पाटील घराण्याची सोलापूर जिल्हय़ाच्या राजकारणात चालत आलेली सद्दी आता संपुष्टात येत असताना उद्या स्वगृही-अकलूज परिसरातही संघर्ष करण्याची पाळी त्यांच्यावर येणार नाही कशावरून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण विरोधकांचे प्रस्थ अकलूज-माळशिरसमध्ये वाढले आहे. ज्या राष्ट्रवादीत मोहिते-पाटील हे वावरत आहेत, त्या पक्षातूनच त्यांना उघडपणे योग्य सन्मानाची वागणूक न मिळता उलट, त्यांचे उरलेसुरले अस्तित्वही संपवण्याचा घाट घातला जात आहे. तरीही मान-अपमान सारे काही सहन करण्याची मानसिकता मोहिते-पाटील हे का बरे बाळगून आहेत, याचे कोडे काही उलगडत नाही. मात्र त्यामुळे हा गट आता केवळ नावापुरताच शिल्लक राहतो की काय, अशी परिस्थिती दिसून येते.
स्थानिक राजकारणात मोहिते-पाटील यांनी घडवलेली व मोठी केलेली मंडळी आज त्यांचेच विरोधक म्हणून नाही तर पर्याय म्हणून पुढे आली आहेत. पवार काका-पुतण्यांची ताकद पाठीशी असल्याने मोहिते-पाटील विरोधक सरस ठरत आहेत. २००९ सालची लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून मोहिते-पाटील यांना विरोध या एकाच महत्त्वाच्या मुद्यावर पुढे आलेली मंडळी आज ‘गब्बर’ बनली आहेत. आजच्या घडीला संपूर्ण जिल्हय़ात जनाधार असलेला एकही अनुयायी त्यांच्याकडे राहिला नाही. जी मंडळी शिल्लक आहेत, ती एक तर राजकीयदृष्टय़ा शून्य किंमत असलेली किंवा हुजरेगिरी करणारी आहेत. त्याचा विचार करताना मोहिते-पाटील यांना डोळे उघडे ठेवून काम करताना स्वत:च्या गटाची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही फेरमांडणी करताना त्यांना स्वत:च्या कुटुंबाचे कवच सोडण्याची गरज असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी परिस्थितीचे भान ठेवून मोहिते-पाटील यांनी स्वत:च्या कुटुंबापेक्षा विरोधकाला अध्यक्षपद देण्याची व्यूहरचना केली गेली असती तर त्याचे परिणाम वेगळे पाहावयास मिळाले असते. या संदर्भात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आखून दिलेले आदर्श आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर माढय़ाचे मोहिते-पाटील यांचे सध्याचे विरोधक असलेले आमदार बबनराव शिंदे यांचे वडील विठ्ठलराव शिंदे यांना सामावून घेण्याचा विषय आला होता. त्या वेळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या सहकाऱ्यांपैकी दिवंगत ब्रह्मदेव माने, वि. गु. शिवदारे व इतर मंडळींनी विरोध केला. हा विरोध शंकरराव मोहिते यांना अर्थात रुचला नव्हता. त्यांनी आपल्या अस्तनीतले निखारे असलेल्या सहकाऱ्यांना शह देण्यासाठी स्वत:चे प्रमुख कट्टर विरोधक करमाळय़ाचे नामदेव जगताप यांनाच बँकेचे अध्यक्ष केले होते. ही घटना सध्याच्या परिस्थितीत मोहिते-पाटील यांच्यासाठी पुरेशी शहाणपण देणारी ठरावी.