एकाच चित्रपटसृष्टीत काम करणा-या दोन व्यक्तींमध्ये वाद असणे ही बाब नवीन नाही. त्यातून सलमान-शाहरुख यांच्यातील वाद तर बहुचर्चित आहे. मात्र भल्याभल्या राजकारण्यांमधील दरी साधणा-या इफ्तारच्या मेजवानीने या दोन खानांनाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्यास भाग पाडले. या दोन खानांप्रमाणेच आता इतर बॉलीवूड कलाकारांनीही त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्याचे ठरविले असल्याचे दिसते. सोनम आणि रणबीरमधला वादही आता काही प्रमाणात मिटत आहे. ‘साँवरिया’ चित्रपटातून सोनम कपूर आणि रणबीर कपूर या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, ‘साँवरिया’ तिकीटबारीवर अपयशी ठरल्यानंतर सोनम कपूर सेक्सी दिसत नाही, अशी टीका रणबीर कपूरने केली होती. तेव्हापासून त्यांच्यात सुरू झालेला वाद अखेर अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत संपला. शाहीद आणि ‘कमिने’ चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यातील भांडण संपुष्टात आले असून दोघेही एकत्रितपणे ऑक्टोबर महिन्यात नवीन चित्रपटाचे काम सुरु करणार आहेत.
प्रियांका चोप्रा आणि करिना यांच्यातील मैत्री शाहीदमुळे तुटली होती. करिनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर शाहीद आणि प्रियांका यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या चर्चेमुळे या दोघींमधील मैत्री लोप पावली होती. मात्र, प्रियांकाच्या वडिलांच्या शोकसभेला करिना आपल्या बहिणीसोबत उपस्थित होती. त्यामुळे, प्रियांका-करिनामधील मैत्रीचे संबंध पुन्हा प्रस्थापित होत आहेत असे वाटते. बॉलिवूडची चर्चित जोडी रणबीर-कतरिना सध्या त्यांच्या छायाचित्रांमुळे प्रकाशझोतात आहेत. कतरिना आणि रणबीरची पूर्वाश्रमीची प्रेयसी दीपिका पादुकोण यांच्यातही कोल्ड वॉर असल्याचे सांगण्यात येत होते. पण, या दोघीही करण जोहर आणि अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीला एकत्र दिसल्याने यांच्यातील ही कॅट-फाइट आता संपत असल्याचे दिसते.
यावरुन, बॉलीवूडमध्ये सध्या मैत्रीचे वारे वाहत आहेत असे म्हणण्यास वाव आहे.