नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘सोनी मराठी’वरील ‘भेटी लागी जीवा’ मालिकेत पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये ‘नायिकाप्रधान’ मालिकांची चलती असते. मात्र ‘भेटी लागी जीवा’ ही पहिली ‘पुरुषप्रधान’ मालिका असल्याचा दावा करण्यात येत आहे. या मालिकेतील तीन पिढय़ांच्या तीन प्रमुख पुरुष व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरते. नव्या विचारांच्या मालिका यायला हव्या, अशी अपेक्षा अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली. ‘भेटी लागी जीवा’ मालिकेत ‘तात्या जंगम’ ही भूमिका साकारली आहे. भारुड, निरुपणाच्या माध्यमातून तो समाजाचे प्रबोधन करतो. प्रबोधन करताना अंधश्रद्धेचं निमूर्लन करायचं आणि पुराणातल्या गोष्टींचे दाखले देताना विनोदनिर्मितीही होईल याचं भान या व्यक्तिरेखेला आहे. मनोरंजन आणि प्रबोधन हे या मालिकेचं मूळ सूत्र आहे. या ‘तात्या जंगम’च्या कुटुंबात त्यांची पत्नी, भाऊ , मानलेला मुलगा आहेत. त्यांचा एक मुलगा लहानपणीच घर सोडून निघून गेला असून तो घरी परत आलेला नाही. माणसांच्या मनाचा आणि वृत्तीचा शोध या मालिकेतून घेतला असल्याचे नलावडे म्हणाले. ही तीन पिढय़ांची गोष्ट असून प्रत्येक पिढी वेगळ्या विचारांची आहे. त्यामुळे पिढी बदलते तशी मतभिन्नताही येते आणि त्यातून होणारा अटळ संघर्ष मालिकेत पाहायला मिळतो. भूमिका साकारताना अभिनयाचा कस लागेल, अशा भूमिकेच्या शोधात होतो. या मालिकेच्या निमित्ताने अशी आव्हानात्मक भूमिका मिळाली असल्याचेही नलावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. मालिका निर्माते आणि मनोरंजन वाहिन्यांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. ही फक्त मनोरंजनाची माध्यमं असली तरीही ती फक्त मनोरंजनाची न राहता मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही झाले पाहिजे. एका बाजूला समाज झपाटय़ाने बदलतोय, नवे तंत्रज्ञान, नवे बदल, विचार समोर येत आहेत. पण हे असं सगळं उघड होणं आणि करणं घातक आहे. या सगळ्यावर कुठेतरी अंकुश असलाच पाहिजे. त्यासाठी चांगली कथानकं हवीत, चांगल्या व्यक्तिरेखा हव्या. एक विचार देणं गरजेचं असून निर्माता-दिग्दर्शक, लेखक यांनी हे भान नेहमी ठेवले पाहिजे. प्रेक्षकांनी हे असंच बघायला पाहिजे असा पवित्रा घेऊ न जर अशा वैचारिक मालिकाही ताकदीने सादर झाल्या तर प्रेक्षकही अशा मालिकांकडे वळतील. खूप उघडं दिसलं की आपण त्याच्याकडे बघत नाही, पण थोडंसं झाकून ठेवलेलं दिसलं की त्याच्यातलं सौंदर्य वाढतं. त्यामुळे नव्या विचारांच्या मालिका आल्या पाहिजेत. असे मतही नलावडे यांनी व्यक्त केलं. चित्रपट, नाटक आणि मालिका ही तिन्ही माध्यमं आपापल्या परीने सामर्थ्यवान असून त्यातील प्रत्येक गोष्टीची चव तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने घेता आली पाहिजे. चित्रपटात तुमच्यातील कलात्मकतेला खूप वाव असतो. ते एक प्रभावी माध्यम आहे. नाटक तुम्हाला नेहमीच ताजंतवानं ठेवतं. आपल्या कामाची प्रतिक्रियाही पटकन मिळते. नाटक तुम्हाला सगळ्या क्षेत्रांत काम करण्यासाठी सुदृढ बनवतं, त्यामुळे मी नाटकात जास्त रमतो. नाटकामुळेच मी उभा आहे. आपल्याला नेमकं कशातून समाधान आणि प्रेरणा मिळेल ते काम आपण केलं पाहिजे, असंही नलावडे यांनी सांगितलं. नाटक, चित्रपट, मालिका या माध्यमांचा हेतू एकच असला तरी प्रत्येकाचा अनुभव आणि बुद्धीला मिळणारं खाद्य वेगवेगळं आहे. मालिका हे लगेचच मिळणारं खाद्य असून नाटकातून खुराक आणि अभिनयाला आवश्यक तो व्यायाम मिळतो. नाटक करत करत तुम्ही चित्रपट आणि त्यानंतर मालिकांकडे वळावं. चित्रपट आणि मालिकांमधून तुम्हाला झटपट प्रसिद्धी मिळते म्हणून त्याकडे वळू नका. नाटकातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विकास नाटकातून करता येतो. त्यामुळे नाटकातून तावून सुलाखून नंतरच अन्य माध्यमांत काम करा. अरुण नलावडे