सोनी वाहिनीवरील वादग्रस्त मालिका 'पहरेदार पिया की' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल झाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ब्रॉडकास्टींग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिल’कडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य ते निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत बीसीसीसीनं सोनी वाहिनीला मालिका प्रसारणाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ही मालिका रात्री ८.३० वाजता प्रसारित होते. बीसीसीसीनं मालिका रात्री दहा वाजता प्रसारित करण्यास सांगितले आहे. इतकंच नव्हे तर 'ही मालिका बालविवाहास प्रोत्साहन देत नाही' अशी सूचनेची पट्टीही मालिकेदरम्यान चालवण्यास सांगितलं आहे. या मालिकेत ९ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यांचं लग्न होताना दाखवण्यात आलंय. हेच कथानक अनेकांना खटकलंय. मालिका प्राइम टाइममध्ये असल्याने लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होतो असा उल्लेख ऑनलाइन याचिकेत केला होता. याचाच विचार करत बीसीसीसीनं मालिकेच्या वेळेत बदल करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे आता यावर मालिकेच्या निर्मात्यांचं काय म्हणणं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वाचा : फिटनेससाठी कतरिनाला गुरु मिळतात तेव्हा. मालिकेच्या निर्मात्यांनी या संपूर्ण वादावर आपली बाजू मांडण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषददेखील घेतली होती. मालिकेविरोधातील याचिकेला विरोध करणारे कित्येक जण टीव्हीही बघत नाहीत असं निर्मात्यांनी यावेळी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे 'आम्हालाही आमच्या सीमा माहित आहेत. समाजाबाहेर जाऊन कुठलीही गोष्ट आम्ही मालिकेत दाखवत नाही आहोत,’ असंही त्यांनी म्हटलं होतं.