चित्रपटसृष्टीत कलाकारांचे मानधन निश्चित करताना बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला जातो. कलाकाराची लोकप्रियता, त्याचे किंवा तिचे अभिनय कौशल्य आणि चित्रपटाच्या दृष्टीने त्यांच्या भूमिकेला दिले जाणारे प्राधान्य या सर्व गोष्टी नजरेत घेत कलाकारांच्या मानधनाचा आकडा ठरतो. मुख्य म्हणजे प्रत्येक चित्रपटसृष्टीत मानधनाच्या आकड्याची गणितं विविध पद्धतींनी हाताळली जातात. ज्यात बहुतांश वेळी पुरुष कलाकारांच्या मानधनाचा आकडा नेहमीच जास्त असल्याचे पाहायला मिळते. अर्थात याला काही अपवादही आहेत. पण, तरीही पुरुष कलाकारांचे मानधन आणि अभिनेत्रींच्या हाती येणारे मानधन या विषयावर नेहमीच चर्चा रंगल्याचे आणि मतमतांतरे झाल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्री अनुष्का शेट्टीने या विषयावर तिचे मत मांडले आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या चित्रपट कारकिर्दीविषयी माहिती देणाऱ्या अनुष्काने मानधनाच्या मुद्द्यावरही तिची भूमिका स्पष्ट केली. 'कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जास्त मानधन मिळावे असेच वाटत असते. अभिनेत्यांना (पुरुष कलाकारांना) तुलनेने जास्त मानधन मिळते कारण, मानधनाची कमाई केल्यानंतर मिळाल्यानंतर गमावण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आणि कारणंही त्यांच्याकडे असतात. त्यांच्याकडे एकाच वेळी बऱ्याच चित्रपटांचे प्रस्ताव आणि जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना जास्त मानधन मिळण्यात गैर असे काहीच नाही. किंबहुना त्यांना ते मिळालेच पाहिजे', असे मत तिने मांडले. कर्ता, कर्म आणि ‘करनी’ अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मानधनाच्या मुद्द्यावरुन चर्चा करणयाऐवजी अभिनेत्रींच्या दृष्टीने काही दमदार भूमिका का लिहिल्या जात नाहीत, अभिनेत्रींसाठी काही दर्जेदार भूमिकांची मांडणी केली आणि त्यांनाही एखाद्या अभिनेत्याप्रमाणेच रुपेरी पडद्यावर सादर केले तर हे गणित आणखीन सोपे होईल अशी भूमिका मांडत अनुष्काने काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मुलाखतीतच तिने अभिनेता प्रभास आणि तिच्या नात्यावरुनही पडदा उचलला. प्रभास आणि मी फक्त आणि फक्त चांगले मित्र आहोत असे म्हणत मला कोणी जोडीदार भेटला तर मी नक्कीच त्यांच्यासोबत पुढच्या आयुष्याचा विचार करेन असेही तिने सांगितले.