सिनेमा पाहताना आपल्याला त्यातील प्रसंग अतिशय सरळ-सोपे वाटत असले तरीही ती दृश्य पडद्यावर सादर करण्यासाठी पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागतो. आपण देत असलेली गोष्ट समोरच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी विविध प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावे लागतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित 'बोगदा' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान असाच एक किस्सा समोर आला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. त्यादरम्यानच्या एका सीनसाठी पडद्यामागील कलाकारांची मेहनत खूप कामी आली. वेंगुर्ला गावातील एका जुन्या मंदिराच्या तलावात मृण्मयीला नृत्य करायचे होते. परंतु, हे मंदिर खुप जीर्ण आणि निर्मनुष्य असल्याकारणामुळे, पाण्यात उतरण्यासारखी या तलावाची अवस्था नव्हती. शिवाय, शेवाळी आणि मातीचा तवंग साठलेल्या या तलावात विषारी सापांचे वास्तव्यदेखील होते. 'बोगदा' सिनेमाच्या कथानकासाठी, या तलावात चित्रीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याकारणामुळे या तलावातील पाणी पूर्णतः स्वच्छ करण्याचे अभियान तिथे सर्वप्रथम राबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करताना 'बोगदा' सिनेमाचे छायाचित्रकार प्रदीप विघ्नवेळू यांनी स्वतः पाण्यात उतरत तलावाची पाहणी केली. सापाचा कोणताही धोका नसल्याची खात्री बाळगत त्यांनी मृण्मयीला पाण्यात उतरण्यास सांगितले. मृण्मयीनेदेखील मनात कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता तलावातील आपला सीन वन टेक पूर्ण केला. येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा नुकताच ७५ व्या 'वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'च्या अंतिम निवडप्रक्रीयेपर्यंत पोहोचला होता. जागतिक पातळीवरील या महोत्सवात 'बोगदा' सिनेमाने भारतातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमांच्या निवडप्रक्रियेत इतर चित्रपटांना चुरशीची लढत दिली होती. या सिनेमाचे लेखन, पटकथा आणि संवाद निशिता केणी यांनी केले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. याबरोबरच करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे.