चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अन्य तीन जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री करून १४ जणांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रम गोखले यांच्यावर करण्यात आला आहे. अभिनेते विक्रम गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरोधात पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार जयंत बहिरट यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षांपूर्वी जयंत म्हाळगी आणि सुजात म्हाळगी यांनी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली होती. त्यातील गिरीवन प्रोजेक्टचे विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा प्रकल्प सरकारमान्य असल्याचं सांगत खोटी प्रलोभनं देऊन ग्राहकांना आकर्षित केलं, असा आरोप ठेवण्यात आला आहे. विनाहरकत मोजण्या करून घेण्याचा आदेश दिला असतानाही संचालकांकडून वेळोवेळी हरकत घेण्यात येत होती. तसंच मोजणी झाल्यानंतर प्लॉटधारकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. हा प्रकल्प खासगी हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा दावाही फिर्यादींकडून करण्यात आला आहे. या सर्वांवर ४२०, ४६५, ४६८, ३४१,४४७, ४२७ आणि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विक्रम गोखले यांच्याशी संपर्क साधल्यास तो होऊ शकला नाही. तसंच त्यांच्या सहाय्यकांशी संपर्क साधल्यास त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.