दिलीप ठाकूर
‘लिम्फोसार्कोमा ऑफ द इन्टेस्टाईन’ म्हणजे काय हे तुम्हाला माहित्येय? ‘आनंद’ (राजेश खन्ना) ला देखिल कुठे माहित होते?  पण आपल्याला कोणता तरी जगावेगळा आजार झालाय आणि आपण आता काही दिवसाचेच आयुष्य जगणार असून त्या उर्वरित आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगावा, इतरांना आनंद द्यावा असे त्याला मनोमन वाटतेय. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे त्याचे आपले आयुष्यविषयक तत्वज्ञान आहे. कॅन्सर म्हणजे काय हे रुपेरी पडद्यावर सर्वप्रथम हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (१९७०) मध्ये समजले. अतिशय गंभीर आजाराची एक प्रकारे हसतखेळत मांडणी या चित्रपटात झाल्यावर आपणही दुर्दैवाने अशा एखाद्या गंभीर व्याधीने त्रस्त झाल्यावर ‘आनंद’सारखेच मनमोकळेपणाने जगावे असे त्या काळात सर्वसामान्यांना वाटे. ‘आपको मिल के बहुत खुशी हुई, आपको हुई की नही?’ राजेश खन्नाच्या बकबकपणाचे खूपच गारुड होते.

चित्रपटातील कॅन्सर प्रवासाची एकीकडे बरीच उदाहरणे असतानाच काही स्टार्सदेखिल दुर्दैवाने याच व्याधीने ग्रस्त होण्याच्या घटना घडत आहेत. मनिषा कोईरालाने त्यावर मात केली. इरफान खान, सोनाली बेन्द्रे देखील याच कॅन्सर विरोधातील लढाईत निश्चितच विजयी होतील. त्यासाठी त्यांना आपल्या कुटुंबाची साथ व मित्र आणि चाहत्यांकडून भरभरुन सदिच्छाही आहेत. आपणास एखादी व्याधी वा आजार झालाय यावरुन चित्रपटसृष्टी, माध्यमे आणि चित्रपट रसिक यांमध्ये उगाचच काहीतरी अफवा, दंतकथा पसरू देण्यापेक्षा आपणच सोशल मिडियातून त्याची कल्पना द्यावी असा या कलाकारांनी स्वीकारलेला मार्ग त्यांची मॅच्युरिटी व समंजसपणा दाखवणारा आहे.

चित्रपटातील कॅन्सर प्रवासाची उदाहरणे अनेक आणि विविध स्वरूपाची. ह्रषिदांच्याच ‘मिली’ला (जया भादुरी) हीच समस्या असते. या चित्रपटाची मांडणी संयत आहे. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अनुराग’मध्ये हसतखेळत जगणाऱ्या एकत्र कुटुंबातील शाळकरी मुलाच्या (मास्टर सत्यजित) वाढदिवसालाच समजते त्याला कॅन्सर आहे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबच हादरते. त्यांचा रोजचा फुलवालाही (राजेश खन्ना) कमालीचा भावूक होतो. या मुलाचे डोळे त्याच्या निधनानंतर एका दृष्टिहीन युवतीला (मौसमी चटर्जी)  दिले जातात.  एकाच चित्रपटात असे अनेक घटक गुंफवत दुःखाची तीव्रता कमी केलीय. याचे कारण कॅन्सर म्हणताक्षणीच समोर जणू मृत्यूच दिसतो अशी समाजाची मानसिकता होती, काही प्रमाणात आजही कायम आहे. ‘हरजाई’ चित्रपटात नायक व नायिका (रणधीर कपूर व टीना मुनिम) या दोघांनाही कॅन्सर असतो. त्यामुळेच प्रेक्षकांवर दबाव वाढला आणि त्यानी चित्रपटच नाकारला. ‘अखियो के झरोखो से’ (रंजीता), ‘यादगार’ (कमल हासन), ‘दर्द का रिश्ता’ (बालकलाकार खुशबू) अशी कॅन्सरग्रस्त चित्रपटाची परंपरा रुळली.

कधी दिग्दर्शकाने आजाराचे गांभीर्य दाखवतानाच चित्रपटाचे मनोरंजन मूल्यही जपले. ‘दर्द का रिश्ता’मध्ये गणपती विसर्जनाचे गाणेही आहे. प्रेक्षकांपर्यंत हा आजार पोहचवायचाय पण तो घाबरूनदेखील जायला नको अशी ती मांडणी असते. कालांतराने ‘कल हो ना हो’ (शाहरुख खान), मुन्नाभाई एमबीबीएस (जिमी शेरगिल),’यह दिल है मुश्किल’ (अनुष्का शर्मा), ‘वक्त’ (अमिताभ बच्चन), ‘कट्टी बट्टी’ (कंगना रणोत) इत्यादी काही चित्रपटातून कॅन्सर असणारी व्यक्तिरेखा दिसली. फार पूर्वी चित्रपट प्रेक्षक पडद्यावरील जगात फारच भावनिकरित्या गुंतत जात आणि ‘आनंद’ पाहताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत. आजही अनेकांचा अत्यंत आवडता चित्रपट ‘आनंद’च आहे. माझाही आहे पण मला त्यातील आयुष्य समरसून जगण्याची उर्मी महत्त्वपूर्ण वाटते. दिग्दर्शकाला तेच मांडायचे होते. कॅन्सरभोवतीचे पूर्वीचे काही चित्रपट बटबटीत होते. तर कालांतराने आलेले चकाचक. कॅन्सरचे निदान होताच गर्भगळीत न होता मानसिक ताकद कशी वाढवायची, पथ्ये कशी असावीत, आयुष्याची घडी कशी सांभाळायची हे चित्रपटात येणे गरजेचे आहेच. आजच्या पिढीचे पटकथाकार, दिग्दर्शक व कलाकार अशी सकारात्मक कलाकृती साकारतीलच.

प्रादेशिक चित्रपटातूनही कॅन्सर पाह्यला मिळतोय. फार पूर्वी ‘अंजली’ या मल्याळम चित्रपटात एका लहान मुलीला असतो. हा चित्रपट हिंदीत डब झाल्यावर पाह्यचा योग आला. ऑस्करसाठीची मराठी चित्रपटाची पहिली प्रवेशिका असणार्‍या संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’मधील शाळकरी मुलाला (अश्विन चितळे) डोळ्याचा कॅन्सर असतो. माणसाला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो हे चित्रपटातून दिसून येते. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘ह्रदयांतर’मध्ये एका श्रीमंत कुटुंबातील मुलीला कॅन्सर असतो. चित्रपटातून माणसाच्या जगण्यातील सगळेच पैलू, घटक येतात. त्यात आजारपणही आहेच. पण कॅन्सर कोणालाच होऊ नये. ‘आनंद’ मधील जॉनी वॉकर एकदा म्हणतोच, “यह बिमारी किसी को ना हो…”