सध्या बॉलिवूड कलाकारांमध्ये लग्नाचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कलाकार मंडळी गुपचूप लग्न करण्याच्या तयारीतही असल्याचे म्हटले जातेय. या सर्व लग्नाच्या चर्चांमध्ये एक नाव नेहमीच समोर येते ते म्हणजे अभिनेता सलमान खानचे. सलमान लग्न कधी करणार हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करतोय. ऐश्वर्यापासून कतरिनापर्यंत विविध अभिनेत्रींशी त्याचं मान जोडले गेले. पण, आतातरी त्याने संसार थाटावा अशीच असंख्य चाहत्यांची अपेक्षा आहे. पण, अभिनेत्री राणी मुखर्जी मात्र याला अपवाद ठरतेय. सलमानने लग्न करावे अशी राणीची मुळीच इच्छा नाही.

‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या व्यासपीठावर राणी गेली होती. राणीने सलमानला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्य म्हणजे लग्न न करताच तू बाबा हो, असे तिने त्याला सांगितले. सलमानची मुलं आपल्या मुलीसोबत म्हणजेच आदिरासोबत चांगली मैत्री करु शकतात, तिला साथ देऊ शकतात, तिच्यासोबत खेळू शकतात असे तिला वाटते. त्यामुळेच राणीने ‘दबंग खान’ला हा सल्ला दिला.

सलमानने लग्न न करताच बाबा व्हावे, असे राणी खोडकरपणे म्हणाली खरं. पण, लग्नाविषयीच्या प्रश्नांनी इतरांप्रमाणेच तिनेही त्याच्या नाकी नऊ आणले. यावेळी एकेकाळी ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचा तोच अंदाज आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्याची निखळ बाजू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अनेकांनाच मदत करणारा हा ‘यारों का यार’ सलमान राणीचा सल्ला मनावर घेणार की येत्या काळात लग्न करुन संसार थाटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा : ‘जब वी मेट・मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

 

दरम्यान, राणी आणि सलमानच्या एकत्र येण्याने बिग बॉसच्या मंचावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या आगामी ‘हिचकी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राणी कार्यक्रमात पोहोचली होती. गेला काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेली राणी ‘हिचकी’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली असून, ती यात यशस्वी होणार का, याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.