भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामी भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. केंद्राच्या या निर्णयावर अभिनेता दिलजीत दोसांझ याने आनंद व्यक्त केला आहे. “पबजीवाल्यांनो आता तुम्हाला कुठलंच कारण देता येणार नाही.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. बॅन कऱण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अ‍ॅप्सचा चीनशी संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही म्हटलं आहे.